प्रतिनिधी / पंढरपूर
2014 साली युतीचे सरकार आले होते. त्यावेळेस देखील भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या चर्चा झाल्या होत्या. मात्र नुकतेच कॉंग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावरून ते आता पुढे आले आहे. महाराष्ट्रात सत्तेसाठी अभद्र युती झाली आहे. सेनेची हिंदुत्वाची विचारसरणी तर कॉंग्रेसची पुरोगामी विचारसरणी आहे. मात्र राज्यातील सत्तेमधील तीनही पक्षाची आप- आपली विचारधारा कुठे आहे ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
भाजपा जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे पंढरपूर येथे मंगळवारी आले होते. यावेळी त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पुढे बोलाताण खडसे म्हणाले, महाराष्ट्रात सेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्ष सत्तेसाठी आप-आपली विचारधारा सोडून एकत्र आली आहे. या तिन्ही पक्षांची विचारधारा कुठे आहे ? तसेच शिवसेनेचे खा.संजय राऊत यांनी कॉंग्रेस पक्षावर टीका केली. मात्र, कॉंग्रेसने सत्तेसाठी शिवसेनेला माफ केले अशी सडकून टीका भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.
सरकार स्थापन झाल्यानंतर एकमेकांच्या विरोधात वक्तव्ये केली आहेत. सेनेचे खा. राऊत यांनी तर करीमलाला बरोबर कॉंग्रेसचे संबंध होते असा आरोप केला. मात्र कॉंग्रेसने सत्तेसाठी सेनेला माफ केल्याची बोचरी टीका खडसेंनी यावेळी केली. माझे पक्षात कोणाशी मतभेद नाहीत. जे चुकले ते मी स्पष्टपणे सांगतले. कारण चूक सुधारावी हि माझी भावना आहे. जर माझे चुकत असेल तर आणि माझी चूक दाखवली तर मी देखील सुधारेन असे एका प्रश्नाला उत्तर देताना खडसे यांनी आपली पक्षाबाबतची भूमिका स्पष्ट केली.