हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन, 1983 विश्वचषकाचा साक्षीदार हरपला, भारतीय क्रिकेट वर्तुळावर शोककळा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताचे 1983 विश्वचषक विजयातील हिरो यशपाल शर्मा यांचे मंगळवारी हृदयविकाराने निधन झाले. मध्यफळीतील तडफदार फलंदाज म्हणून त्यांनी आपली विशेष ओळख प्रस्थापित केली होती. निधनसमयी ते 66 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात, पत्नी, 2 कन्या व चिरंजीव असा परिवार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यशपाल आपल्या मॉर्निंग वॉकनंतर घरी परतले आणि पोहोचल्यानंतर काहीच वेळात खाली कोसळले.
आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत यशपाल यांनी 37 कसोटी सामने खेळत त्यात 1606 धावांचे योगदान दिले. याशिवाय, 42 वनडे सामन्यात त्यांनी 883 धावा जमवल्या. या दोन्ही क्रिकेट प्रकारात त्यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. 1983 विश्वचषक मोहिमेत ओल्ड ट्रफोर्डवर इंग्लंडविरुद्ध रंगलेल्या उपांत्य सामन्यात यशपाल यांनी झळकावलेले धडाकेबाज अर्धशतक लक्षवेधी ठरले होते.
माजी भारतीय कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी यशपाल यांची एक्झिट चटका लावणारी असल्याचे नमूद केले. काही आठवडय़ांपूर्वी एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळय़ात झालेल्या भेटीला त्यांनी येथे उजाळा दिला. ‘यशपाल निवर्तले, यावर विश्वास ठेवणेही कठीण आहे. आम्हा सर्वांमध्ये तेच सर्वात तंदुरुस्त होते. आम्ही भेटलो, त्यावेळी यशपालना त्यांच्या रुटीनविषयी विचारले. यशपाल शाकाहारी होते, मद्यापासून दूर होते आणि डिनरवेळी आवर्जून सूप घ्यायचे. अगदी मॉर्निंग वॉकबद्दल देखील ते अतिशय आग्रही होते’, असे कर्नल याप्रसंगी म्हणाले.
‘खेळाडू या नात्याने सांघिक स्तरावर त्यांचे उत्तम योगदान असायचे. ते खरे लढवय्ये होते. 1979 मध्ये पाकविरुद्धच्या दिल्ली कसोटीत आम्ही दोघांनी दमदार भागीदारी साकारत सामना वाचवला होता. मी यशपाल यांना माझ्या महाविद्यालयीन स्तरापासून ओळखत आलो. त्यांच्या निधनाच्या वृत्तावर विश्वास ठेवणे कठीण आहे’, असे वेंगसरकर पुढे म्हणाले. 1979 मधील दिल्ली कसोटीत वेंगसरकरांनी तेथे नाबाद 146 व यशपाल यांनी 60 धावांचे योगदान दिले होते.
माजी फिरकीपटू बलविंदर सिंग संधू यांनी आपण ऐकलेली ही सर्वात वाईट बातमी आहे, अशा शब्दात शोक व्यक्त केला. 1983 चा संघ एक कुटुंबासारखा होता आणि त्यातील एक सदस्य हरपणे अर्थातच वेदना देणारे आहे, असे ते म्हणाले.
याच संघातील आणखी एक सदस्य कीर्ती आझाद यांनीही यशपालना श्रद्धांजली वाहिली. ‘1983 विश्वचषक विजयातील ते आमचे आणखी एक हिरो होते. विंडीजविरुद्ध सलामी लढतीत यशपालनीच गेमप्लॅन तयार केला आणि आम्ही तो सामना जिंकला. उपांत्य फेरीत बॉब विलिसला खेचलेला षटकार निव्वळ प्रेक्षणीय होता. आता जडेजाच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचे कौतुक होते. यशपाल देखील त्याच श्रेणीतील होते. विजेच्या वेगाने येणारे त्यांचे थ्रो थेट यष्टीचा वेध घेत असत’, असे आझाद याप्रसंगी म्हणाले. अनिल कुंबळे, युवराज सिंग, विरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण, इरफान पठाण यांनीही विविध माध्यमातून यशपाल यांना श्रद्धांजली वाहिली.
धोनीला पदार्पणाची संधी
यशपाल शर्मा 2000 च्या दशकातील प्रारंभी राष्ट्रीय निवडकर्ते होते आणि महेंद्रसिंग धोनीला 2004 मध्ये भारतीय संघातून पदार्पणाची संधी देणाऱया निवड समितीत त्यांचा समावेश होता. 2011 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाची निवड करणाऱया निवड समितीतही यशपाल समाविष्ट होते. विश्वचषक जिंकून देण्यापासून विश्वचषक जिंकणाऱया संघाची निवड करण्यापर्यंत त्यांनी लक्षवेधी योगदान दिले.
कोटस
1983 विश्वचषक मोहिमेतील यशपाल शर्मा नेहमीच सर्वप्रिय सदस्य राहिले. ते संघसहकाऱयांसाठी प्रेरणास्थान होते. चाहत्यांसाठी आशास्थान होते आणि युवा पिढीतील खेळाडूंसाठी आदर्श होते. त्यांचे निधन वेदनादायी आहे.
-पंतप्रधान नरेंद मोदी
यशपाल शर्मा कट्टर शाकाहारी होते आणि दौऱयावर देखील दाल-चावल, छोलöराजमा कुठे मिळू शकेल, याच शोधात असायचे. एकदा यात यश आले की संघसहकाऱयांना देखील मेजवानी ठरलेली असायची. आपला आहार आणि तंदुरुस्ती याबाबत यशपाल अतिशय काटेकोर राहिले.
-1983 विश्वचषकातील सहकारी कीर्ती आझाद
1983 विश्वचषकात भारतीय संघातर्फे सर्वाधिक धावा जमवणाऱया फलंदाजांमध्ये दुसऱया स्थानी राहिलेल्या यशपाल यांचे योगदान अनमोल आहे. त्यांनी पंच व निवड समिती सदस्य म्हणून काम पाहिले. त्यांचे योगदान कधीच विसरले जाणार नाही.
-केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकुर
शर्माजी यांच्या निधनाचे वृत्त चटका लावून जाणारे आहे. 1983 विश्वचषकातील त्यांचे फलंदाजीतील अनेक डाव मला आजही आठवतात. त्यांचे योगदान भारतीय क्रिकेट वर्तुळात नेहमी स्मरणात राहतील.
-माजी कर्णधार सचिन तेंडुलकर
आम्ही 3 दौऱयांवर एकत्र होतो आणि त्यातील अनेक आठवणी आजही मनात तितक्याच ताज्या आहेत. पण, यशपाल यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. जुन्या आठवणींना उजाळा देण्यातइतपतही मनाची तयारी नाही.
-राष्ट्रीय संघसहकारी बलविंदर सिंग संधू
3 रणजी संघातर्फे प्रतिनिधीत्व करणारा तडफदार फलंदाज
यशपाल शर्मा यांनी रणजी क्रिकेटमध्ये पंजाब, हरियाणा व रेल्वे अशा चक्क 3 संघांचे प्रतिनिधीत्व केले आणि यात 160 सामने खेळत 8933 धावांचे योगदान दिले. यशपाल यांनी रणजी क्रिकेटमध्ये 21 शतके झळकावली. शिवाय, 201 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या ठरली.
जेव्हा कपिल म्हणाले, या क्षणी बोलणेही अशक्य!
1983 विश्वचषकातील सर्व संघसहकारी यशपाल यांच्या निधनाने साहजिकच सुन्न झाले. वृत्तसंस्थेने 1983 विश्वचषकातील भारतीय कर्णधार कपिल देव यांच्याशी संपर्क साधला, त्यावेळी कपिल चटकन म्हणाले, यशपाल यांचे निघून जाणे अतिशय चटका देणारे आहे. या क्षणी बोलणेही अशक्य!
ग्रेग चॅपेल वादात सौरभ गांगुलीला पाठबळ देणारा धुरंधर
यशपाल शर्मा यांनी 2007 मध्ये तत्कालीन वादग्रस्त प्रशिक्षक ग्रेग चॅपेल व कर्णधार सौरभ गांगुली यांच्यातील वाद जवळून अनुभवला आणि ठळक बाब म्हणजे निवडकर्ते या नात्याने ते समर्थपणे गांगुलीच्या पाठीशी उभे राहिले. यशपाल यांनी काही महिला वनडे सामन्यात पंच म्हणूनही काम पाहिले. उत्तर प्रदेश रणजी संघाच्या प्रशिक्षकपदाचा कार्यभारही त्यांनी सांभाळला. अगदी अलीकडे काही टीव्ही चॅनेल्सवर विश्लेषक म्हणून ते सहभागी झाले होते.
माल्कम का प्यार का निशानी!
1983 मध्ये सबिना पार्क कसोटीतील आठवणींना उजाळा देताना यशपाल एकदा म्हणाले होते, ‘मी तेथे 63 धावांची खेळी साकारली आणि सर्वात शेवटी बाद झालो होतो. अर्थात, ड्रेसिंगरुममध्ये आलो, टी शर्ट काढला आणि माल्कम मार्शलच्या एका बाऊन्सरने अंगावर उठलेला चट्टा दिसून आला. मी मनातच म्हणालो होतो, माल्कम का प्यार का निशानी’!
गट्स, ग्लोरी आणि बीबीसीने कव्हर न केलेली ती इनिंग्ज!
कपिलच्या 175 धावांच्या खेळीचे बीबीसीकडे फुटेज आहे का, हे तपासून पाहण्यासाठी यशपाल यांनी बीबीसीशी कित्येक वेळा संपर्क साधला आणि ते एकदा म्हणाले होते, त्या फुटेजसाठी मी बीबीसीला अगदी 5 हजार पौंड देखील सहज दिले असते!
असे होते यशपाल!
माल्कम मार्शलशी माझे अनोखे द्वंद रंगायचे. मी क्रीझवर आल्यावर किमान दोनवेळा छातीपर्यंत उसळणारे चेंडू तो निश्चितपणाने टाकायचा, असे दिवंगत यशपाल फिरोजशाह कोटला ग्राऊंडवर चहाचा घोट रिचवत मागे एकदा म्हणाले होते.
मंगळवारी भारतीय क्रिकेटने शेवटच्या चेंडूपर्यंत निकराने लढणारा माजी योद्धा गमावला आणि अशा अनेक आठवणींना नव्याने उजाळा मिळाला. यशपाल ज्याप्रमाणे 1983 विश्वचषक विजयाचे सदस्य होते, त्याचप्रमाणे 1979 विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध नामुष्कीजनक पराभवातील सदस्यही होते. लंकेविरुद्ध पराभवानंतर 1983 वर्ल्ड चॅम्पियन्स होईतोवर ते एक सेतू देखील होते.
भले यशपाल यांच्याकडे सुनील गावसकरांचा क्लास, दिलीप वेंगसरकरांचा फ्लेअर किंवा गुंडाप्पा विश्वनाथ यांचा एलिगन्स नसेल, पण, यशपाजी यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख प्रस्थापित केली होती.
यशपाल यांचा जन्म लुधियानाचा. डोमेस्टिक वर्कहॉर्सेस म्हणून ते प्रारंभी विशेष नावारुपास आले आणि हीच ओळख आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही प्राप्त केली. राष्ट्रीय शालेय क्रिकेटमध्ये त्यांनी 260 धावांची धमाकेदार खेळीही साकारली होती. 1970 च्या दशकात यशपाल पंजाबच्या फलंदाजीचे सुपरस्टार होते. दिल्ली असो वा मुंबई, यशपालना बाद करणे हे प्रतिस्पर्ध्यांचे मुख्य लक्ष्य असायचे.
उत्तर झोनतर्फे दक्षिण झोनविरुद्ध दुलीप ट्रॉफी फायनलमध्ये इरापल्ली प्रसन्ना, बीएस चंदशेखर व एस. वेंकटराघवन यांच्यासारख्या अव्वल गोलंदाजांचा सामना करताना यशपाल यांनी 173 धावांची धमाकेदार खेळी साकारली आणि ते राष्ट्रीय पटलावर आले. 37 कसोटीत 34 ची सरासरी, 2 शतके आणि 42 वनडेत 30 पेक्षा कमी सरासरी त्यांचा 1980 ते 1983 मधील करिष्मा प्रतिबिंबित करत नाही, हे मात्र तितकेच खरे. 1980 ते 1983 ही त्यांची सुवर्ण वर्षे होती आणि या कालावधीत मध्यफळीत त्यांचे ऑटोमेटिक सिलेक्शन जणू ठरलेले असायचे!
1983 विश्वचषकाच्या आठवणी यशपाल, कपिल, मोहिंदर अमरनाथ किंवा रॉजर बिन्नी यांच्याभोवती अधिक रेंगाळतात. कपिलची टर्नब्रिजवरील बीबीसीने कव्हर न केलेली 175 धावांची इनिंग्ज चर्चेत येते. पण, यशपाल शर्मा यांच्या विंडीजविरुद्ध विश्वचषक सलामी लढतीत 89 धावांच्या खेळीनेच त्या स्पर्धेचा सर्व नूर पलटला होता, याची अनेकांना आठवण आहे. मायकल होल्डिंग, मार्शल, अँडी रॉबर्ट्स व जोएर गार्नर यांच्या तोफखान्याला सामोरे जात 120 चेंडूत 89 धावांच्या खेळीला ते आपली सर्वोत्तम वनडे खेळी मानत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटच्या साखळी सामन्यात ते टॉप स्कोअरर ठरले. मात्र, उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध नाबाद 61 धावांची खेळी अधिक दाद मिळवून गेली. त्या सामन्याचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण पेले गेले आणि यशपाल यांची ती छबी भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात कायमचे स्थान निर्माण करुन गेली.
‘यश अतिशय मेथॉडिकल होते. कॉपीबूक टेस्ट प्लेयर होते. पण, व्हीव रिचर्ड्सप्रमाणे ऑफस्टम्पवर येऊन बॉब विलिससारख्या गोलंदाजाला फ्लिकचा षटकार खेचण्याचा पराक्रमही त्यांनी गाजवला. पॉल ऍलॉटला लेगस्टम्पवर येत स्ट्रेट सिक्स खेचावा तो यशनीच आणि शॉर्टलेगवरुन नॉन स्ट्रायकर एण्डची यष्टी उद्ध्वस्त करत ऍलन लॅम्बला धावचीत करावे ते देखील यशनीच, असे कीर्ती आझाद याप्रसंगी म्हणाले.
यशपाल यांची न्यूझीलंडविरुद्ध 1980 मध्ये ऍडलेडवरील 72 धावांची खेळी देखील तितकीच महत्त्वाची. यादरम्यान त्यांनी डावखुरा पेसर गॅरी ट्रूपला एकाच षटकात 3 षटकारही खेचले होते. यूटय़ूबवर चॅनेल नाईनवर आजही त्यांच्या क्लिपिंग पाहता येऊ शकतात. सुनील गावसकर व कपिलदेव सर्वकालीन हिरो ठरतील, यात वाद नाही. मात्र, प्रत्येक हिरोला यशपाल शर्मा यांच्यासारख्या अष्टपैलूचा सॉलिड सपोर्ट लागेल, हे देखील तितकेच खरे!