प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेचा अर्थसंकल्प फेब्रुवारी अखेरीस मंजूर करणे बंधनकारक आहे. मात्र, मार्च महिना संपत आला तरी अद्याप मनपाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली नाही. अर्थसंकल्पात काही त्रुटी असल्याने कौन्सिल विभागाने तो लेखा विभागाकडे पाठविला होता. पण मार्च संपत आला तरी अजूनही अर्थसंकल्पाचा तिढा सुटला नसल्याने मनपाचा अर्थसंकल्प रखडला आहे.
महापालिकेच्या कायद्यानुसार फेब्रुवारी अखेरीस अर्थसंकल्प मंजूर करून राज्य शासनाकडे पाठविणे बंधनकारक आहे. पण 2022-23 चा अर्थसंकल्प फेब्रुवारी अखेरीस तयार करून मंजुरीसाठी कौन्सिल विभागाकडे पाठविण्यात आला होता. पण प्रशासकांनी काही त्रुटी असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे त्रुटींचे निवारण करण्यासाठी अर्थसंकल्प लेखा विभागाकडे पाठविण्यात आला होता. त्रुटांचे निवारण करून अर्थसंकल्प प्रशासकाकडे मंजुरीसाठी पाठविण्याची गरज होती. पण लेखा विभागाकडे पाठविण्यात आलेला अर्थसंकल्प आतापर्यंत कौन्सिल विभागाकडे परत आला नाही. त्यामुळे मनपाचा अर्थसंकल्प अद्यापही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
2022-23 च्या अर्थसंकल्पातील तरतुदींनुसार विकासकामे राबविणे आवश्यक आहे. अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतरच कोणताही खर्च करता येऊ शकतो. पण मार्च संपत आला तरी मनपाच्या अर्थसंकल्पाला अद्याप मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे मनपाचा अर्थसंकल्प कधी मंजूर होणार, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
महापालिका कार्यालयातील बेजबाबदार अधिकाऱयांमुळे मनपाचा अर्थसंकल्प मंजुरीविना रखडल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.