हॉटेल व्यवसाय बंद असल्याने मच्छीमार अडचणीत : मच्छीमार्केटही बंद : कोरोनाचा फटका सर्वाधिक मच्छीमारांना
मनोज चव्हाण / मालवण:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मच्छीमार्केट बंद असल्याने मालवणातील मासळी बाजारात बुधवार सकाळपासून मासळी विक्री सुरक्षित अंतर ठेवून करण्यात आली. सध्या मासळी कमी प्रमाणात मिळत असली, तरी मच्छीमारांना अपेक्षित मासळीचा दर मिळत नसल्याने कवडीमोल भावाने विक्री करण्याची वेळ आली आहे. मोठी मच्छीमार्केट बंद असल्याने मच्छीविक्रेत्या महिलांनाही मिळेल, त्या भावात मासळीची विक्री करावी लागत आहे. मालवणच्या खवय्यांना कमी दरात चांगल्या प्रकारे मासळी खायला मिळत आहे.
पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी किनारपट्टीवरील मासळी एजंट यांची भेट घेऊन सुरक्षित अंतर ठेवून मासळी विक्री करण्याबाबत आणि मच्छीमार महिलांना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेऊन मासळी विक्री करण्याच्या सूचना केल्या होत्या. याबाबत त्यांनी मच्छीमार नेत्यांनाही यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले होते. आज सकाळपासून मच्छीमार एजंटांनी लिलाव पूर्णपणे बंद ठेवून कार्यवाही सुरू केली. यासाठी विकी तोरसकर, छोटू सावजी, बाबी जोगी, दिलीप घारे यांनी पुढाकार घेत मच्छी विक्रेत्या महिलांना माहिती दिली. त्यामुळे किनाऱयावर होणाऱया नागरिकांच्या गर्दीवर नियंत्रण आणता येणे शक्य झाले आहे.
लिलाव प्रक्रिया पूर्णपणे बंद
आज सकाळी मच्छीमार्केट परिसरात मच्छी एजंटांनी मासळी लिलाव पूर्णपणे बंद करत बोट मालक आणि मच्छीमार विपेत्या महिलांना थेट खरेदी-विक्री करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे त्यांनी खरेदी करून सुरक्षित अंतर ठेवून मासे विक्री सुरू केली. ग्राहकांनाही चांगल्याप्रकारे मासे खरेदी करण्याची संधी मिळाली. महिला विक्रेत्यांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव स्वतःहून घेतलेला पुढाकार कौतुकास्पद होता.
माफक दरात मिळाली मासळी
मालवणच्या मार्केटमध्ये सगळय़ा प्रकारची मासळी उपलब्ध होते मात्र हॉटेल व्यवसाय आणि इतर ठिकाणी मासळीला प्रचंड मागणी असल्याने स्थानिक खवय्ये नेहमीच दरावरून नाक मुरडत असत. मात्र, लॉकडाऊन काळात मासळी वाजवी आणि वाजवीपेक्षा कमी दरात उपलब्ध होत असल्याने खवय्यांची चांगलीच चंगळ झाली आहे. सुरमई सातशे ते आठशे रुपये किलो दराने, तर कधी-कधी तीनशे ते चारशे रुपये किलो दराने मिळत आहे. मत्स्य खवय्यांतून मासे कमी दरात मिळत असल्याने आनंद व्यक्त होत आहे.
संपूर्ण व्यवसाय अडचणीत – दिलीप घारे
ऐन मच्छीमार हंगामात लॉकडाऊनमुळे मासेमारी आणि त्यावर अवलंबून असलेले संपूर्ण अर्थकारण कोलमडून गेले आहे. मच्छीमार आपल्या अस्तित्वासाठी धडपडत आहेत. जीवावर उदार होऊन समुद्रात जाऊन मासेमारी करून मिळालेली मासळी स्थानिक मार्केटमध्ये कवडीमोल भावाने विकण्याची वेळ आली आहे. हातावर पोट घेऊन जगणाऱया मच्छीमार समाजाला शासनाने आधार देण्याची वेळ आली आहे. मच्छीमारीचा फक्त एक महिना शिल्लक असून मिळालेल्या मासळीला योग्य दर न मिळाल्यास पावसाळय़ात चार महिने जगायचे कसे? असा सवाल श्रमजीवी रापण संघाचे दिलीप घारे यांनी केला आहे.