अर्थ, गृह विभाग ठेवला स्वतःकडे
वृत्तसंस्था / जयपूर
राजस्थान सरकारच्या मंत्र्यांना सोमवारी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी खातेवाटप केले आहे. गृह तसेच न्याय विभाग, अर्थ आणि डीओपी यासारखे महत्त्वाचे विभाग मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवले आहेत. तर गोविंद सिंह डोटासरा यांच्या जागी डॉ. बी. डी. कल्ला यांना शिक्षणमंत्री करण्यात आले. तर शांति धारीवाल यांना पूर्वीप्रमाणेच शहरविकास खाते देण्यात आले.
मुख्यमंत्री गेहलोत यांच्याकडे अर्थ तसेच कर, गृह आणि न्याय, कार्मिक, सामान्य प्रशासन, कॅबिनेट सचिवालय, एनआरआय, आयटी तसेच कम्युनिकेशन, माहिती आणि जनसंपर्क हे विभाग असणार आहेत.
कल्ला यांना शिक्षण, संस्कृत शिक्षण, कला तसेच संस्कृती हे विभाग देण्यात आले. वैद्यकीय तसेच आरोग्य विभागाची जबाबदारी परसादी लाल मीना यांना सोपविण्यात आली आहे. सहकार विभागाची धुरा उदयलाल आंजना यांच्याकडे देण्यात आली. खातेवाटपात सचिन पायलट यांच्या गटाचे समाधान करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
गेहलोत मंत्रिमंडळात रविवारी 11 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती. मंत्रिपद न मिळालेल्या 6 आमदारांना मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. काँग्रेसने स्वतःच पंजाबनंतर राजस्थानमधील सरकारबद्दलची नाराजी शमविण्यासाठी रविवारी गेहलोत मंत्रिमंडळात व्यापक फेरबदल केले होते.
2023 मध्ये होणारी विधानसभा निवडणूक डोळय़ासमोर ठेवून हे पाऊल उचलण्यात आले होते. याच्या माध्यमातून जातीय, क्षेत्रीय आणि पक्षांतर्गत समीकरणे जुळवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर बसप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या 5 आमदारांनी सत्तेत भागीदारी न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. पण या आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.