हेमंत विश्व शर्मा यांच्याकडून आचारसंहितेचे उल्लंघन
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
30 ऑक्टोबर रोजी आसाममध्ये होणाऱया विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारमोहिमेदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री तसेच भाजप नेते हेमंत विश्व शर्मा यांना निवडणूक आयोगाने बुधवारी ताकीद देऊन माफ केले आहे.
भाजपचे स्टार प्रचारक शर्मा यांनी आदर्श आचार संहितेच्या संबंधी आयोगाकडून जारी निर्देशांचे उल्लंघन केले आहे. याचमुळे आता आयोग त्यांना भविष्यात अधिक साधव राहणे, संयम बाळगणे आणि सार्वजनिक स्वरुपात विधाने करताना आदर्श आचार संहितेच्या तरतुदींचे कठोर पालन करण्याबद्दल सतर्क करत असल्याचे आयोगाच्या आदेशात म्हटले गेले आहे.
पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान रस्ते तसेच अन्य विकास योजनांचे आश्वासन देत आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयोगाने शर्मा यांना सोमवारी कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
भवानीपूर, थोवरा आणि मारियानी विधानसभा मतदारसंघातील प्रचारादरम्यान वैद्यकीय महाविद्यालय, पूल, रस्ते, महाविद्यालय, स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॅम्पस तयार करण्याची घोषणा शर्मा यांनी केली होती. तसेच चहामळय़ांमधील मजुरांच्या स्वयंसहाय्य गटांना वित्तीय मदत देण्याचे आश्वासन शर्मा यांनी दिल्याची तक्रार आयोगाकडे करण्यात आली होती.
आपण केलेल्या घोषणा या सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांशी संबंधित होत्या किंवा अर्थसंकल्पात त्यासंबंधी तरतूद होती. आपण कुठलीच नवी घोषणा केली नसल्याचा युक्तिवाद शर्मा यांच्याकडून करण्यात आला होता. आयोगाने आदर्श आचार संहितेच्या कुठल्याही तरतुदीचा अजाणतेपणी उल्लंघन झाल्यास बिनशर्त माफी मागण्यासंबंधी शर्मा यांच्या अर्जावर विचार करत केला आहे. राज्यात 30 रोजी पोटनिवडणूक होणार असून 2 नोव्हेंबरला याचा निकाल जाहीर केला जाणार आहे.