वर्षभर खड्डय़ांचे निर्माण झालेले साम्राज्य दूर, नागरिकांतून समाधान
चिपळूण / प्रतिनिधी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी विनंती, मागण्या, निवेदने, आंदोलने करूनही प्रशासकीय यंत्रणा दाद देताना दिसत नव्हती. मात्र गुरूवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या पाहणीसाठी येणार असल्याचे कळल्यानंतर बुधवारी रात्री 10 वाजल्यानंतर बहादूरशेखनाका परिसरासह महामार्गावरील खड्डय़ांत डांबराचा थर टाकण्यात आला.
शहर परिसरातील रस्त्यावर खड्डे हा मोठा चर्चेचा विषय बनलेला आहे. त्यातच महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू झालेले असतानाच बहुतांशठिकाणी पडलेले खड्डे मात्र भरले न गेल्याने वाहनचालक त्रस्त झालेले आहेत. आंदोलनाचे इशारे देऊनही आंदोलक थकले. मात्र महामार्ग, नगर परिषद असो अथवा सार्वजनिक बांधकाम विभाग असो कोणत्याच यंत्रणेने या खड्डय़ांकडे लक्ष दिलेले नाही.
दरम्यान, गुरूवारी मुख्यमंत्र्यांचा दौरा जाहीर झाला. कोयनानगर येथून दौऱयाचा मार्ग असला तरी ऐनवेळी दौऱयात बदल होऊ शकतो हे लक्षात घेऊन प्रशासकीय यंत्रणेने पुरेपूर काळजी घेतली होती. त्यातूनच मग बुधवारी सायंकाळी अधिकृत दौरा जाहीर झाल्यानंतर रात्री दहा वाजल्यापासून बहादूरशेखनाका परिसरातील खड्डे भरण्यास सुरूवात झाली. रात्रीचे सुरू असलेले खड्डे भरण्याचे काम पाहून नागरिकांनीही आश्चर्य व्यक्त केले. मुख्यमंत्री चिपळुणात आलेले नसले तरी त्यानिमित्ताने वर्षभर पडून राहिलेले खड्डे मात्र भरले गेल्याने नागरिकांनी मुख्यमंत्र्यांनाच धन्यवाद दिले आहेत.