सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अनादर झाल्याबद्दल खेद व्यक्त
प्रतिनिधी / वास्को
गोवा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी मुरगाव मतदारसंघातील महिलांना अखेर राखीव प्रभाग प्राप्त झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. मात्र, पालिका क्षेत्रात आरक्षण जाहीर करताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रोटेशन पध्दतीचा वापर करण्यात आला नसल्याने त्यांनी खेद व्यक्त केला आहे.
मंगळवारी संध्याकाळी वास्कोत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संकल्प आमोणकर यांनी राखीवतेच्या प्रश्नावर सरकारने घातलेला घोळ, नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांनी या घोळात बजावलेली प्रमुख भुमीका व आपण आणि आपल्या कार्यकर्त्यांनी या अन्यायाविरूध्द केलेला संघर्ष या विषयी माहिती देऊन त्यांनी मिळालेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. सत्तेच्या बळावर आपण काहीही करू शकतो असे समजणाऱया नेत्यांना आपल्या कार्यकर्त्यांनी न्यायालयीन लढा देऊन अद्दल घडवली आहे. नगरविकासमंत्र्यांनी या पराभवाची जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांना हटवावे अशी मागणी त्यांनी पुन्हा केली. माजी उपनगराध्यक्ष शांती मांदेकर व माजी नगरसेविका श्रध्दा आमोणकर यांनी न्याय मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांच्या लढय़ाला यश आल्याबद्दल यावेळी आमोणकर यांनी व ज्येष्ठ कार्यकर्ते कांता मांदेकर यांनी शांती व श्रध्दा यांचा सन्मान केला. यावेळी माजी नगराध्यक्ष शरद चोपडेकर, भावना भोसले, माजी नगरसेवक निलेश नावेलकर, सॅबी डिसोजा व मुरगाव वारीयर्स या पॅनलचे उमेदवार उपस्थित होते.
आमोणकर यांनी यावेळी बोलताना महिलांना राखीवता दिलेली नसतानासुध्दा आपल्या पॅनलमध्ये तीन महिला उमेदवारांचा समावेश होता. आता नव्या आरक्षणामुळे बदल करावा लागणार असल्याने शक्य झाल्यास महिला उमेदवारांच्या संख्येत वाढ करू असे सांगितले. मुरगाव मतदारसंघातील महिलांना पालिका निवडणुकीत राखीव प्रभागात जाहीर झाल्याने आम्हा सर्वांना आनंद झालेला आहे. आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जाणार असून तेथेही आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास आमोणकर यांनी व्यक्त केला. सरकारने मुरगावातील महिलांसाठी राखीव जागा जाहीर केल्याने हा प्रश्न राहिलेला नसला तरी ही राखीवता जाहीर करताना रोटेशन पध्दतीचा अवलंब करण्यात आलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने तसा स्पष्ट आदेश दिला होता. न्यायालयाच्या आदेशाचा आदर झालेला नसल्याने खेद वाटत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केला. या विषयी कुणी न्यायालयात आव्हान अर्ज दाखल केल्यास आम्ही योग्य सहकार्य करू असेही ते म्हणाले. यावेळी शांती मांद्रेकर, श्रध्दा आमोणकर, शरद चोपडेकर, निलेश नावेलकर व शंकर पोळजी यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांच्या कार्यपध्दतीवर टीका केली.