गोवा सूरक्षा मंचचे युवा अध्यक्ष नितीन फळदेसाई यांचे प्रतिपादन
वाळपई प्रतिनिधी
आमचा आयायटीला विरोध नाही, पण जनतेने जिवापाड पिढय़ानपिढय़ा सांभाळलेल्या संपत्तीची नासधूस करून आम्हाला आयायटी नको. गोव्यात लोकांचे कमीतकमी नुकसान होईल अशी जागा सरकारने अवश्य निवडावी, मात्र सामान्यतः जनतेवर अन्याय होत असेल तर गोवा सुरक्षा मंच गप्प बसणार नाही, मेळावली वासिंयांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नाही, असे प्रतिपादन गोवा सुरक्षा मंचचे युवा अध्यक्ष नितीन फळदेसाई यांनी केले.
मेळावली वासियांच्या समर्थनार्थ निदर्शने करण्यासाठी गोवा सुरक्षा मंचचे कार्यकर्ते आज आझाद मैदानावर जमले होते. यावेळी नितीन देसाई पत्रकारांशी बोलत होते. यावेळी अभय सामंत,विनय नाईक,हर्षद देवारी,स्वरुप नाईक,संतोष सतरकर,दत्ताराम हरमलकर,विनायक च्यारी ,संदिप पाळणी,सुरेश पवार,निळकंठ कुंभार,शिवाजी ओजरकर ,उद्देश वेळीप,संजय मालशेकर,शेखर पालेकर,समिर खुटवाळकर,सुनिल सांतिनेजकर,सखाराम भगत,गुरुनाथ नागवेकर,बबन केरकर,धीरज सावंत,रोशन सामंत ,उदय शिरोडकर,सचित्तानंद विश्वकर्मा,महेश शेटये उपस्थित होते.
पिढय़ानपिढय़ा मेहनतीने सांभाळलेली साधनसंपत्तीवर सरकारने हक्क गाजवू नये. मध्यंतरी सांगे येथे सरकारने जमिनीची पाहाणी केली होती. तेथे लोकांचा विरोधही नव्हता. लोकांचेही नुकसान नव्हते, तसेच वनराईही तितकी कापावी लागणार? नाही, अशा जागेत आयायटीचा प्रस्ताव व्यवस्थित बसला असता, तरीही मेळावलीच का? असा प्रश्न फळदेसाई यांनी केला.
विविधांगी जीवसंपदा नष्ट करण्यासाठी सरकार टपले आहे, लोकांच्या जमीनीवर नावावर न केल्याने त्यांना कर्ज योजनांचा लाभ मिळत नाही, हा त्यांच्यावरील अन्याय दूर करायचे सोडून सरकार मेळावली वासियांना आणखी अन्याय करायच्या तयारीत आहे, पण हा सरकारचा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नसल्याचे फळदेसाई यांनी स्पष्ट केले.
राजकिय लागेबांधे, किंवा मोठय़ा उद्योगपतींची हुजरेगिरी सरकार करत नाही ना? आयायटीच्या नावाखाली कुणाचे तरी लाड पुरविण्याचा सरकारचा प्रयत्न नाही ना? अशी शंका फळदेसाई यांनी व्यक्त केली. प्रकल्प गोव्यातच राहावा, यासाठी सरकारचा हा शेवटच्या टप्प्यातील हा प्रयत्न आहे, पण मेळावली हा पर्याय नाही, असेही ते म्हणाले.