अमित शहा यांच्या निवेदनाने खळबळ, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी
प्रतिनिधी/ पणजी
गोवा सरकारला विश्वासात घेऊनच कर्नाटकाला म्हादईचे पाणी वळवू दिले व हा प्रश्न भाजप सरकारने संगनमताने सोडविला, असे खळबळजनक निवेदन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी बेळगाव येथे केल्यानंतर गोव्यात तिव्र संतापाची लाट पसरली आहे. गोव्याचा विश्वासघात गोव्यातील भाजप सरकारने केला असल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव तसेच गोवा फॉरवर्ड नेते विजय सरदेसाई यांनी केली आहे. म्हादईप्रश्नी राज्यात पुन्हा वातावरण तापले असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हादईच्या प्रत्येक थेंबासाठी आम्ही लढा देऊ आणि गोमंतकीय जनतेच्या हितरक्षणाचेच काम करू, असे आश्वासन जनतेला दिले.
गोव्यात म्हादईच्या पाण्यावरून रणकंदन सुरू असतानाच म्हादईचे पाणी वळविण्याबाबत गोव्यातील भाजप सरकारशी सल्लामसलत केली होती आणि त्यानंतरच कर्नाटकला म्हादईचे पाणी वळविण्यात आले आहे, अशी स्पष्ट कबुली भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज कर्नाटक येथे दिल्याने म्हादई नदी वाचविण्याच्या गोव्याच्या लढाईला मोठा धक्का बसला आहे.
अमित शहा यांच्या या विधानामुळे गोव्यातील जनतेत तीव्र संतापाची लाट उसळली आहे. विरोधकांनी म्हादईबाबत केलेली शंका आता खरी ठरल्यानेच भाजप सरकारचा खरा चेहरा उघड झाला आहे. मतांसाठी वाट्टेल ते आणि कोणत्याही थराला भाजप सरकार जाते, हे शहा यांच्या विधानावरून स्पष्ट झाले आहे. गोव्यातील भाजप सरकारही म्हादईबाबत दुप्पट्टी भूमिका घेत असल्याचे स्पष्ट झाले असून, माजी मंत्री विजय सरदेसाई, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत व भाजप सरकारनेच म्हादईचा खून केला असल्याचे म्हटले आहे. अमित शहा यांनी कर्नाटकात केलेल्या विधानामुळे म्हादई नदी वाचवण्याच्या गोव्याच्या लढाईला मोठा धक्का बसला असून, राज्यातील भाजप सरकार आता काय निर्णय घेते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
केंद्रातील भाजप सरकारने म्हादईचे पाणी वळविण्याची परवानगी देऊन प्रलंबित असलेला म्हादई पाणी वाद सोडवला आहे. कर्नाटकातील शेतकऱ्यांची तहान भागवण्यासाठी गोवा सरकारला विश्वासात घेऊन कर्नाटकला पाणी वळवण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे शहा यांनी सांगितले. कर्नाटकातील शेतकऱ्यांची तहान भागवण्यासाठी गोवा सरकारला विश्वासात घेऊन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी म्हादईचे पाणी कर्नाटककडे वळवण्याचे स्तुत्य काम केले आहे, असेही अमित शहा यांनी कर्नाटक येथे प्रचारादरम्यान सांगून कर्नाटक सरकारला झुकते माप दिले आहे. म्हादईच्या वादावर भाजप सरकारने तोडगा काढला असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.
म्हादईचा गळा घोटू नये : विजय सरदेसाई
अमित शहा यांनी कर्नाटकात केलेल्या विधानामुळे गोव्यातील जनतेत असंतोष पसरला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हादईच्या निर्णयाबाबत खरे काय ते जनतेसमोर स्पष्ट करावे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. म्हादईचे रक्षण करणे सर्वांचीच जबाबदारी आहे आणि या जबाबदारीतून मुख्यमंत्री सुटू शकत नाहीत. त्यामुळे आता जनतेला खरे काय ते सांगण्याची गरज आहे. केवळ सत्तेचा हव्यास आणि खुर्ची वाचविण्यासाठी म्हादईचा गळा घोटू नये, असे माजी मंत्री विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे.
म्हादईबाबत कोणीही काळजी कऊ नये : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हादई प्रश्नावऊन नव्याने जो गोंधळ निर्माण झाला त्यावर राज्यातील जनतेला आपण आश्वासन देता की, आपण राज्याच्या जनतेचे हित जपण्यासाठी प्रयत्न करीत राहाणार तसेच कर्नाटकाच्या डीपीआरला अद्याप पर्यावरण परवाना देखील मिळालेला नाही. त्यामुळे म्हादईबाबत कोणीही काळजी कऊ नये. म्हादईच्या पाण्यातील प्रत्येक थेंब हा आम्ही जपू आणि गोव्याचे हित सांभाळले जाईल, असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : विजय सरदेसाई
डॉ. प्रमोद सावंत यांनी माता म्हादईची हत्या केली आहे. कारण केंद्रीय नेते अमित शहा यांनी म्हादईचे पाणी कर्नाटकात वळविण्याबाबत गोवा सरकारशी सल्लामसलत केल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. कर्नाटकच्या शेतकऱ्यांची तहान भागवली गोव्याच्या जीवावर हे शहा यांच्या स्पष्टीकरणामुळे डॉ. प्रमोद सावंत यांचा खरा चेहरा समोर आला आहे. आपली खुर्ची वाचविण्यासाठी गोमंतकीयांच्या भावनांशी मुख्यमंत्र्यांनी खेळ केला आहे. प्रमोद सावंत यांच्यामुळे गोवावासीयांना पिढ्यानपिढ्या पाण्यापासून वंचित रहावे लागणार आहे. म्हणून प्रमोद सावंत यांचा खोटारडेपणा उघडला पडल्याने त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशा शब्दात गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख तथा आमदार विजय सरदेसाई यांनी ट्विटरवरून मागणी केली आहे.
कोट करा…
म्हादईच्या रक्षणासाठी काँग्रेस कटिबद्ध : युरी आलेमाव
कर्नाटकात भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी जे विधान केले आहे, त्याचा आपण निषेध करतो. कारण कर्नाटक ही गोव्याची अस्मिता आहे. यावर आम्हाला राजकारण करायचे नसून, भाजपचा खोटारडा चेहरा समोर आला आहे. शहा यांनी कर्नाटकात स्पष्ट कबुली देताना हेही सांगितले आहे की, “काँग्रेस पक्ष हा म्हादईचे पाणी एक थेंब कर्नाटकला देणार नसल्याचे सांगत आहे. परंतु आम्ही गोव्याचे पाणी आता कर्नाटकला दिले आहे.” या शहा यांच्या विधानावरूनच गोव्याचे म्हादईचे रक्षण हे काँग्रेस करीत आले आहे, हे स्पष्ट होते. याच्या उलट भाजपनेच म्हादईला कर्नाटकाच्या घशात घातले आहे. त्यामुळे नैतिक जबाबदार स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन म्हादई वाचविण्यासाठी लोकांसोबत रस्त्यावर उतरून लढा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.
कोट करा…
आम्हाला न्यायालयावर विश्वास : निर्मला सावंत
उत्तराखंड येथे जलविद्युत प्रकल्प उभारत असताना माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत भाषण करताना या प्रकल्पाविषयी भीती व्यक्त केली होती. ‘विनाश या विकास’ असा प्रश्न या प्रकल्पामुळे उपस्थित केला होता. त्यानंतर जोशी मठ येथे जो प्रकार झाला तो या प्रकल्पामुळे हे सुषमा स्वराज यांचे म्हणणे खरे ठरले आहे. त्यामुळे अशीच भीती आम्हाला म्हादईबाबत सतावत आहे. म्हादईचे पाणी कर्नाटकाने वळविल्यास पाण्यासाठी गोमंतकीयांना वणवण फिरावे लागेल आणि म्हणून म्हादई बचाव अभियानातर्फे कोर्टात याचिका दाखल केली आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. म्हादई बचाव अभियान सर्वोच्च न्यायालयात जाईल. म्हादईबाबत सरकार काय पाऊले उचलेल व काय निर्णय घेईल हे पाहुया. पण, सध्या जे ‘तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो’ असेच सरकारच्या कृतीवरून दिसते आहे. स्वराज्य यांनी संसदेत शास्त्रातील उदाहरण देताना ‘अपुज्य यत्र पुज्यते पुज्यानाम तु अतिक्रम’, ‘त्रिणितं भविष्यंति । विध्वंसं मरण भयं।’ असे सांगितले होते. आता ही भीती गोव्याच्या बाबतीतही खरी ठरणार आहे, हे निश्चित.
– निर्मला सावंत, म्हादई बचाव अभियानाच्या प्रमुख.