गडहिंग्लज तालुक्यात 91 परीक्षा केंद्रे, दहावीचे 3683 तर बारावीचे 4495 विद्यार्थी देणार परीक्षा
प्रकाश चौगुले / महागाव
दहावी-बारावीच्या परीक्षा नियोजित पद्धतीने ऑफलाईन होणार असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘शाळा तिथे परीक्षा केंद्र’ देण्याचा निर्णय राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. या निर्णयानुसार गडहिंग्लज तालुक्यात 91 केंद्रे आसणार आहेत. यामध्ये माध्यमिक विभागासाठी आजरा तालुक्यातील 5 केंद्रासह 71 परीक्षा केंद्रे व कनिष्ठ महाविद्यालय विभागात गडहिंग्लज तालुक्यात आजरा तालुक्यातील 1 केंद्रासह 20 परीक्षा केंद्रे असणार आहेत. दहावी व बारावीच्या परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने याचे नियोजन केले असून तालुक्यात दहावीचे अंदाजे 3683 तर बारावीचे 4495 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
कोरोना प्रादुर्भाव कमी होत असल्याने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या सोयीच्यादृष्टीने शाळा तेथे केंद्र, उपकेंद्र या पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. ज्या शाळा महाविद्यालयातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या 15 अथवा त्याहून अधिक आहे. त्यासाठी परीक्षेचे उपकेंद्र असणार आहे. गडहिंग्लज तालुक्यात दहावीचे आंदाजे 3683 विद्यार्थी तर बारावीचे 4495 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तालुक्यात दहावी व बारावीसाठी गडहिंग्लज येथील मुख्य कस्टडीमधून परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पाठवल्या जाणार आहेत.
तेथून उपकेंद्रावर रनरच्या सहाय्याने प्रश्नपत्रिका देऊन पुन्हा विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या उत्तरपत्रिका केंद्रावर जमा करुन केंद्रावरील सर्व उत्तरपत्रिका गडहिंग्लज येथील मुख्य कस्टिडीमध्ये जमा केल्या जाणार आहेत. सदर परीक्षा केंद्रात एका ब्लॉकमध्ये 25 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्याचे नियोजन केले आहे. कोरोना कालावधीत शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या लिखाणाचा सराव कमी झाल्याने 40 गुणांच्या पेपरसाठी 15 व 80 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटे जादाचा वेळ वाढवून देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
या वर्षी 75 टक्के अभ्यासक्रमावर आधारित लेखी परीक्षेचे नियोजन करण्यात आले असून शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातीलच अंतर्गत व बहिस्त परीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत. बारावीची 14 फेब्रुवारी पासून प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा सुरू झाली असून 4 मार्चपासून लेखी परीक्षा आहे. तर दहावीची प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा 25 फेब्रुवारी तर 15 मार्चपासून लेखी परीक्षा सुरू होणार आहे. तसेच इयत्ता बारावी व दहावी परीक्षेच्या प्रात्यक्षिक तोंडी व अंतर्गत मूल्यमापनासाठी विद्यार्थ्यांना परीक्षापूर्वी व परीक्षानंतरही संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सुविधा बाबत शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, परीक्षा केंद्र, परिरक्षक व संबंधित घटकांना विशेष मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आल्या आहेत.