सभागृहात माफी मागितल्याने वादावर पडदा
प्रतिनिधी /बेळगाव
गुरुवारी अतिवृष्टीवरील चर्चेत माजीमंत्री रमेश कुमार यांनी केलेल्या विधानाबद्दल शुक्रवारी कामकाजाच्या सुरुवातीलाच त्यांनी सभागृहाची माफी मागितली आहे. आपल्या विधानामुळे ज्यांची मने दुखावली आहेत, आपण त्यांची माफी मागतो, असे रमेश कुमार यांनी जाहीर केले.
शुक्रवारी सकाळी 11.15 वाजता कामकाजाला सुरुवात झाली. यावेळी दिलगिरी व्यक्त करीत त्यांनी माफी मागितली. अशी एक म्हण आहे, ‘अत्याचार टाळता येणे शक्मय नसेल तर त्याचा आनंद लुटा’ असे विधान केले होते. या विधानाला सर्वत्र विरोध होताच शुक्रवारी त्यांनी माफी मागितली.
कोणाबद्दलच्या द्वेषापोटी आपण असे बोललो नाही. कोणाचे मन दुखावण्याचाही आपला उद्देश नव्हता. अतिवृष्टीवरील चर्चेदरम्यान भाजप-काँग्रेस आमदारांमध्ये खडाजंगी सुरू झाली. त्यावेळी दोन्ही पक्षांच्या आमदारांना संयम बाळगण्याचा सल्ला देताना असे वक्तव्य केले आहे. प्रामाणिकपणे खेद व्यक्त करतो, असे रमेश कुमार यांनी सांगितले.
यावेळी सभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी आम्ही सारेही कुटुंबातूनच आलो आहोत. रमेश कुमार यांच्या वक्तव्यावरून वादंग माजला आहे. आम्ही सारे महिलांचा गौरव करणे आपले कर्तव्य समजतो. त्यामुळे या वादावर पडदा टाकावा. कारण रमेश कुमार यांनी माफी मागितली आहे. हा वाद वाढवू नये, असे आवाहन केले. याचवेळी मंत्री शशिकला जोल्ले, आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी सभाध्यक्षांना उद्देशून विषय मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, रमेश कुमार यांनी माफी मागितल्यामुळे या विषयावर पडदा टाकण्यात आला आहे, असे सभाध्यक्षांनी जाहीर केले.