मुंबई \ ऑनलाईन टीम
पूरग्रस्त आणि दरडग्रस्त नागरिकांसाठी राज्य सरकारने मंगळवारी ११ हजार ५०० कोटी रुपयांचे पॅकेज घोषित केलं आहे. मात्र या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांसारख्या महत्त्वाच्या घटकाला कोणतीही मदत केली नसल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये केवळ प्रत्यक्ष मदत ही १ हजार ५०० रुपयांची केली असल्याचे म्हटलं आहे.
राज्य सरकारने पूरग्रस्त नागरिकांना प्रत्यक्ष मदत केवळ दीड हजार कोटींची केली असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कोकणासह राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने ११,५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली असली तरी याचे विश्लेषण पाहता केवळ १५०० कोटी रूपयांचीच तातडीची मदत केलेली दिसून येते असल्याचे ट्विटमध्ये फडणवीस यांनी म्हटलंय.
दरम्यान राज्य सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकाचे अवलोकन केले असता शेतीपिकांचे नुकसान, अन्नधान्य पुरवठा, स्वच्छता अनुदान, घरांसाठी वाळू-मुरूमची उपलब्धता अशा २०१९ मध्ये देण्यात आलेल्या अनेक मदतींचा त्यात उल्लेख केल्याचे दिसत नसल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या मदतीबाबतचा विस्तृत शासन आदेश जारी झाल्यानंतरच याबाबतची स्पष्टता आल्यानंतरच सविस्तर प्रतिक्रिया देता येईल. प्रथमदर्शनी तरी शेतकर्यांसारख्या महत्त्वाच्या घटकाला कुठलीही मदत केलेली दिसून येत नसल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे.