प्रतिनिधी / राधानगरी
देवगड निपाणी राज्यमार्गावरील राधानगरी तहसील कार्यालयाजवळील ब्रिटिशकालीन पुलाच्या दोन्ही बाजू खचल्या आहेत,तरीही धोकादायक रित्या वाहतूक सुरू आहे.धोका उदभवण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने खबरदारीचे उपाय करण्याची मागणी होत आहे
स्वातंत्र्यपूर्व काळात बंदरी व्यापारी वाहतुकीसाठी महत्वाचा असणाऱ्या या मार्गावर दहा पूल त्या काळात उभारले होते. त्यातील अनेक पूल नव्याने उभारले आहेत. परंतु राधानगरी इथल्या या पुलाच्या संरक्षण कठड्याच्या दुरुस्ती व्यतिरिक्त कोणतीही दुरुस्ती केलेली नाही.
सध्या या पुलाच्या दोन्ही बाजू खचल्याने धोका निर्माण झाला आहे. भिंतीवर वृक्ष उगवल्याने भिंत कमकुवत झाली आहे. तरीही अवजड वाहतूक सुरू आहे. धोक्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही खबरदारी घेतलेली नाही. दिवसागणिक शेकडो अवजड वाहनांची वाहतूक या मार्गावरून होत असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने धोक्याबाबत सुचनाफलक ही लावलेला नसल्याने दुर्दैवी धटनेनंतरच सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणारं का ? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.