बीव्हीजीकडून दिरंगाई होत असल्याचा नगरसेवक विशाल जाधव यांचा आरोप
सातारा / प्रतिनिधी :
खासदार उदयनराजे यांच्या प्रयत्नातून सर्वांसाठी घरे या योजनेतुन युआयडीएसएमटीअंतर्गत शहरात घरकुले बांधण्यात आली. त्यामध्ये सदरबझार येथील लक्ष्मी टेकडीवरील घरकुल अद्याप पूर्ण झालेले नाही. घरकुलाचे काम हाती घेतलेल्या बीव्हीजी या कंपनीने हे काम करण्यामध्ये अतिशय दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळत नाही, असा आरोप नगरसेवक विशाल जाधव यांनी केला आहे.
जाधव म्हणाले, लक्ष्मीटेकडीवरील घरकुलांना दारे, खिडक्या नाहीत, तर काही घरकुलांना अजूनही विजेचे कनेक्शन नाही, पाणी नाही, अशी अवस्था असतानाही संबंधित कंपनी अन्य ठिकाणी कामे करत आहे, घेतलेले काम पूर्ण क्षमतेने केले जात नाही. सातारा शहरात झोपडपट्टीतील नागरिकांना हक्काचे घर मिळावे, यासाठी खासदार उदयनराजे यांनी युआयडीएसएमटी योजनेतून घरकुल योजना आणली होती. त्यामध्ये सदरबझार येथे भिमाबाई आंबेडकर झोपडपट्टी येथे घरकुलांचा वापर सुरु झाला.
शनिवार पेठ, मंगळवार पेठेतही घरे लाभार्थ्यांना मिळून तेथे राहण्यास सुरुवात केली गेली. परंतु लक्ष्मीटेकडीवरचा प्रश्न अजून सुटता सुटत नाही. अर्धवटच अवस्थेत घरकुलाचे काम आहे. याबाबत पालिकेच्या बांधकाम विभागात चौकशी केली असता बीव्हीजी कंपनी काम करत आहे, असे सांगण्यात आले.