वार्ताहर/ औंध
कोरोनामुळे अचानक सुरू असलेल्या कामांना ब्रेक लागला. परंतु पावसाळा तोंडावर असल्यामुळे ठप्प झालेल्या रस्त्याच्या कामांना गती मिळणार असल्याचे खात्रीलायक व्रत असून सोमवार पासून कामे सुरू होण्याची शक्यता बळावली आहे.
सध्या विटा- महाबळेश्वर, फलटण- मायणी, मल्हारपेठ- पंढरपूर, सातारा सोलापूर आदी राज्यमार्गाची कामे सुरू आहेत. अगोदरच गेल्या वर्षी झालेल्या धुव्वाधार पावसामुळे रखडलेल्या कामांना गती देऊन ती निर्धारित वेळेत संपवण्यासाठी ठेकेदारांचा प्रयत्न होता. परंतु अचानकच उद्भभवलेल्या कोरोनाच्या सकंटामुळे रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शासनाने लाँकडाऊन जाहीर केला. लाँकडाऊन मुळे सर्वच कामे बंद करण्यात आली. जवळपास 22 मार्च पासून ही कामे ठप्प आहेत. कामे ठप्प झाली आणि पावसाळा तोंडावर येते असल्याने ही कामे निर्धारित वेळेत कशी पूर्ण करायची याचे कोडे ठेकेदारांच्या पुढे होते. कारण अनेक ठिकाणी राज्यमार्गावर पुलाची, मोयांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर तात्पुरता भराव टाकून तयार केलेला पर्यायी रस्ता पावसाळ्यात वाहून गेल्यास वाहतूक खंडित होण्याची भीती होती. त्यामुळे रखडली कामे लाँकडाऊन मुळे पावसाळ्यापर्यंत संपवण्याचे मोठे आव्हान ठेकेदारांच्या पुढे होते. हीच बाब लक्षात घेऊन दै तरुण भारतने रखडलेल्या कामावर फोकस केला होता.
शासनाने देखील वस्तुस्थिती लक्षात घेऊन पावसाळ्यापूर्वी पूर्ण करता येतील अशा कामांना गती देण्यासाठी पाऊले उचलली आहेत. त्यामुळे ठप्प झालेली कामे सोमवार पासून सुरू होण्याची शक्यता बळावली आहे. याबद्दल जिल्हाधिकारी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी देखील शासनाने रस्ते व इतर अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी लाँकडाऊन शिथीलतेबाबत दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार अत्यावश्यक असलेली कामे सुरू करण्यात येतील असे सांगितले.
नियमांचे पालन करुन कामे सुरू करणार.
शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार पावसाळा सुरू होण्यापूर्वी जी कामे पूर्ण करणे अत्यावश्यक आहे अशी कामे सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. काही पुलांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत ती पूर्ण झाली नाही तर पावसाळ्यात वाहतूक बंद होईल. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नियमांचे काटेकोर पालन करुन ही कामे सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
एस एन राजभोज
अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा.
अशी असतील मार्गदर्शक तत्वे.
रस्ताची, पुलाची कामे सुरू करताना ठेकेदारांना शासनाच्या निर्देशांचे उल्लंघन होणार याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. यामध्ये वाहनातून पाच पेक्षा जास्त कामगारांची वाहतूक करु नये. सोशल डिस्टन्सिं पाळून काम करण्याचे ठिकाण निर्जंतुकीकरण करणे, कामगारासाठी मास्क, हँण्डवाँश साईटवर ठेवणे जास्त कामगार एकाच वेळी एकत्र येणार नाहीत याचे नियोजन करणे आदी बाबीचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.