प्रतिनिधी / लातूर
लातूर महापालिकेत गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या नावाखाली विकासाचे काम झालेले नाही. लातूर शहर विकासासाठी पालकमंत्र्यांनी एक रूपयाचाही निधी आणला नाही. उलट बेकायदा व नियमबाह्य अनाधिकृत बांधकामाच्या नावाखाली आयुक्तामार्फत शहरातील कांही विशिष्ट डॉक्टर, व्यापारी यांना नोटीसा देवून धमकावण्याचे काम सुरू आहे. महापालिकेच्या अधिकार्यांनीच बांधकाम पुर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देणे व तसेच आयुक्तामार्फत नियमबाह्य व बेकायदा बांधकाम झाल्याच्या नोटीसा देणे यातून व्यापारी व कांही डॉक्टरांकडून काँग्रेसच्या कांही नगरसेवकांच्या मध्यस्थीतून भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप मनपा सभागृहनेते अॅड. शैलेश गोजमगुंडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
यावेळी स्थायी समितीचे सभापती अॅड. दिपक मठपती, नगरसेवक शैलेश स्वामी, संदीप रंदाळे, सुनील मलवाड आदि. उपस्थित होते. महापालिकेत कोरोनाच्या नावावरून सत्ताधार्यांकडून गैरवापर तर झालाच उलट शहरातील जनतेची फसवणूक झाल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती अॅड.दिपक मठपती यांनी दिली. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मालमत्ता करात सरसकट 12 टक्के सुट दिल्याचा ठराव मंजुर केला.
सुट वजाजाता नागरीकांना नोटीसा दिल्यानंतर नागरिकांनी आपल्याकडे येणे असलेली रक्कम महापालिकेकडे जमा केली. परंतू करात सुट देण्याचा अधिकार महापालिकेला आहे का ? याचाही सारासार विचार न करता मालमत्ता करात सुट दिल्याचा प्रस्ताव नगरविकास खात्याने नामंजुर केला. आता मात्र लातूरकरांना देण्यात आलेल्या 12 टक्के सुट रक्कमेची भरपाई करावी लागणार आहे. यातही जनतेची फसवणूक झाली. शहरातील मनपा गाळेधारकांना लावण्यात आलेले भाडे अवास्तव स्वरूपात लावण्यात आल्याचे सांगून आताचे पालकमंत्री अमीत देशमुख यांनी भाडे कराराच्या विरोधात मोर्चा आयोजित केला होता परंतू आता मात्र त्यांनीच पुर्वीपेक्षाही भाडे आकारणी जास्तीची केली आहे. हा लातूरकर व्यापार्यांचा सारासार विश्वासघात आहे. भाडेकरारात सुट देवू अशी घोषणा करायची. भाडे करारात कपात करू असे आश्वासन द्यायचे व व्यापार्यांना नोटीसी देवून आयुक्तांशी संगनमत करून बेकायदेशीर वसुलीचा उद्योग मात्र सर्रासपणे सुरू असल्याचा आरोपही अॅड.शैलेश गोजमगुंडे यांनी केला.
पालकमंत्री व महापौरात बेबनाव
पालकमंत्री व विद्यमान महापौर यांच्यात बेबनाव झाला असून महापालिकेतील आर्थिक प्रश्नावर काँग्रेस शहराध्यक्षांचा हस्तक्षेप वाढला आहे. महापौर व पालकमंत्री दोघेही एकमेकांना भेटण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने महापालिकेची विकासकामे बंद झाली आहेत. महापालिका विकास कामांसाठी 1 रूपयांचाही निधी न देणार्या पालकमत्र्यांकडून भाजपाच्या काळात मंजुर झालेली विकासकामे श्रेयवादामुळे होवू दिली जात नाहीत. पालकमंत्र्यांचा अहंकारी स्वभाव लातूरकरांच्या विकास कामासाठी अडसर होत असल्याची टिकाही अॅड.शैलेश गोजमगुंडे यांनी केली.
शहरात डेंग्युची साथ
शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. कोरोनासोबतच डेंग्युसारख्या साथीच्या आजाराने थैमान घातले असून शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शहरातील घंटागाडीची संख्या कमी करण्यात आलेली आहे. लातूरकरांना मात्र कोरोनानंतर डेंग्युसारख्या साथीच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. पालकमंत्र्यांनी लातूरकरांना दिलेली आश्वासने पाळली जात नाहीत. मालमत्ता करात 12 टक्के सुट, भाडेकरारात दिलेले आश्वासन यावर पालकमंत्र्यांनी लातूरकरांना दिलासा द्यावा. मालमत्ता कराची 12 टक्के सुटीची रक्कम पालकमंत्री व महापौरांनी स्वतः भरावी व भाडेकरारात दिलेले आश्वासन यावर पालकमंत्र्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी भाजपाचे गटनेते शैलेश गोजमगुंडे यांनी केले आहे.