कोरोना संसर्ग कमी होत असल्याने राज्य सरकार विचाराधीन : मंत्री आर. अशोक यांचे संकेत
प्रतिनिधी / बेंगळूर
लॉकडाऊनमुळे राज्याची राजधानी बेंगळूरसह इतर जिल्हय़ांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी आणखी काही दिवस वाढविण्यात येण्याची दाट शक्यता आहे. महसूलमंत्री आर. अशोक यांच्यासह काही मंत्र्यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. काही राज्यांनी लॉकडाऊन वाढविल्याने राज्य सरकार मे अखेरपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याच्या विचारात आहे.
राज्यात आणखी 4 आठवडे लॉकडाऊन वाढविण्याची शिफारस कोविड तांत्रिक सल्लागार समितीने राज्य सरकारला केली आहे. कोरोना संसर्ग कमी होण्यासाठी ही बाब अनिवार्य आहे, असे या समितीने म्हटले आहे. महाराष्ट्र, दिल्ली, केरळ या राज्यांमध्ये कर्नाटकापेक्षा आधीच कोरोनाची दुसरी लाट दिसून आली होती. तेथे लॉकडाऊन कालावधी वाढवून कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात येत आहे. या बाबींचा विचार करून राज्य सरकारने मे अखेरपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याबाबत विचार चालविला आहे. मात्र, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
राज्यात लॉकडाऊनची घोषणा होताच शहरी भागात कामानिमित्त वास्तव्यास असणाऱया कामगारांनी गाव गाठले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात संसर्ग वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढविण्याचा सल्ला काही जणांनी सरकारला दिला आहे. किमान आठवडाभर लॉकडाऊन वाढविला तर ग्रामीण भागातही व्यापक प्रमाणात जागृती करून कोरोना नियंत्रणात आणणे शक्य होईल, असे मत काही मंत्र्यांचे आहे. कोविड कृतीदलाच्या बैठकीतही याबाबत चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना मत कळविण्यात येणार असल्याचे समजते.
बेंगळूरमध्ये रुग्णसंख्या कमी झाली आहे. मृत्यूचे प्रमाणही घटले आहे. शिवाय रुग्णांना वैद्यकीय सुविधा समर्पकपणे पुरविणे शक्य झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या हितासाठी एक नागरीक म्हणून लॉकडाऊन कालावधी वाढवावा, असे आपले मत आहे, अशी प्रतिक्रिया आर. अशोक यांनी दिली आहे.
प्रत्येक जिल्हय़ात बालसंगोपन केंद्रे
कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी आतापासूनच तयारी केली जात आहे. या लाटेमध्ये लहान मुलांना धोका होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्हय़ात बालसंगोपन केंद्रे सुरू करून तेथे मुलांबरोबर पालकांनाही राहण्याची व्यवस्था केली जात आहे, असेही आर. अशोक यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांना जाणीव करून देणार!
मंत्री आर. अशोक यांनी, लॉकडाऊन कालावधी वाढविणे हे आपले वैयक्तिक मत आहे. 24 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. हा कालावधी संपण्याच्या तीन दिवस अगोदर मुख्यमंत्र्यांनी बैठक बेलावली आहे. या बैठकीत लॉकडाऊन कालावधी वाढविण्याच्या अनुकुलतेबाबत मुख्यमंत्र्यांना जाणीव करून देण्याचा प्रयत्न करेन. मात्र, याबाबत मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील, असे सांगितले आहे.