अचूक बातमी “तरुण भारत”ची, मंगळवार, 15 जून 2021, स. 11.00
● 15 दिवसांत ऑक्सिजन बेड वाढले नाहीत● टेस्टिंग दर कमी झाला ● पॉझिटिव्हीटी 10.34%, ● मुक्तीदर 178.50% ● काल दिवसभरात 832 जण ● मृत्यू दर कमी करण्यात सपशेल अपयश
सातारा / प्रतिनिधी :
सातारा जिल्हा लॉकडाऊनमधून बाहेर यावा, यासाठी प्रशासनाने जे प्रयत्न करणे अपेक्षित आहे ते होताना दिसत नाहीत. पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड यावर ते अवलंबून असताना जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांत बेड वाढवण्याचे प्रयत्न झाले नाहीतच उलट टेस्टिंग रेट सुद्धा 7 हजारावरून साडेपाच हजाराच्या घरात आला आहे. जिल्ह्याचा सरत्या आठवड्यात पॉझिटिव्हीटी रेट 10.34 टक्के झाला असून सुमारे 57 टक्के ऑक्सिजन बेड आता उपलब्ध आहेत. दरम्यान, सोमवारी दिवसभराचा आकडा 832 इतका आला आहे.
मृत्यूदर कमी करण्यात सपशेल अपयश
गेल्या आठवड्यात दैनंदिन बाधितांचा आकडा आता खाली आला असला तरी या आठवड्यात 153 मृत्यू झाले असून हा दर 3.40 टक्के इतका जास्त आहे. देश आणि राज्य अश्या दोन्हींच्या मानाने हा दर कमी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न झाले पाहिजेत.
चाचण्या करण्याचे प्रमाण मंदावले
31 मे रोजी कडक लॉकडाऊनचा निर्णय झाला त्यानंतर जिल्ह्यात टेस्टिंग आणि ट्रेसिंग ज्या प्रमाणात वाढणे अपेक्षित होते तसे वाढले नाही. आकडे अपलोड घोटाळा “तरुण भारत”ने उघड केल्यानंतर आता त्यावर प्रशासनाचे “कडक लक्ष” असणार आहे. गेल्या आठवड्यात टेस्टिंगचे प्रमाण जे दैनंदिन साडेसात हजारांच्या घरात होते ते सरत्या आठवड्यात केवळ दैनंदिन 5,436 च्या घरात आले आहे. रोजचा बाधित आकडा जर 800 असेल तर ICMR च्या निकषांनुसार सातारा जिल्ह्यात किमान 16 हजार टेस्टिंग होणे अपेक्षित असताना त्याच्या निम्म्याने सुद्धा टेस्टिंग होत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
सोमवारपर्यंत जिल्हय़ात एकूण बाधित 1,81,161, एकूण कोरोनामुक्त 1,68,009, मृत्यू 4,065, उपचारार्थ रुग्ण 9,267
सोमवारी जिल्हय़ात बाधित 623, मुक्त 2,064, बळी 17