फलटण / प्रतिनिधी :
राज्यातील येऊ घातलेल्या जिल्हापरिषद, पंचायत समिती त्यांचबरोबर नगर परिषद, नगर पंचायत निवडणुका सातारा जिल्यात वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते चंद्रकांत खंडाईत यांनी केली आहे. ते फलटण येथे शासकीय विश्रामगृहावर झालेल्या कार्यकर्ता मेळावा प्रसंगी बोलत होते.
खंडाईत म्हणाले, समाजातील वंचित व दुर्लक्षित घटकासह वंचित बहुजन आघाडी ओ. बी. सी. समाजासह मुस्लिम समाजाला प्रधान्याने नेतृत्वाची संधी देणार आहे. आगामी येऊ घातलेल्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे. फलटण तालुक्यात गाव तेथे वंचित बहुजन आघाडीची शाखा सुरु करणार असून, ग्रामीण भागातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याला प्रधान्याने बळ देणार असल्याचे खंडाईत यांनी स्पष्ट केले.
यावेळी सातारा जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळकृष्ण देसाई, सातारा जिल्हा उपाध्यक्ष सुभाषराव गायकवाड, सातारा जिल्हा उपाध्यक्ष गणेश कारंडे, सातारा सचिव सुनील कदम, जिल्हा सहसचिव दादासाहेब केंगार आदी उपस्थित होते.