प्रतिनिधी / सातारा :
गेल्या काही वर्षात सातारा तालुक्याच्या वनविभागाच्या हद्दीत वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांची नोंद पाहायला मिळाली. भविष्यात अशा घटना घडू नये, यासाठी वरिष्ठ अधिकारांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात खबऱ्यांचे जाळे सर्वदूर पोहचवून गस्त पथक सजग करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करुन शिकारीच्या घटना रोखणार असल्याचे सातारा तालुका वनविभागाचे वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण यांनी सांगितले.
चव्हाण म्हणाले, सातारा शहर परिसर, यवतेश्वर, परळी खोरे, सज्जनगड फाटा ते जांभे येथील पठार परिसर, तसेच तालुक्यातील औद्योगिक वसाहत, देगाव, शेंद्रे, वर्णे परिसर सह्याद्रीच्या पर्वत रांगांनी व्यापून गेला आहे. मुबलक नैसर्गिक साधन संपत्ती, घनदाट जंगल त्यामध्ये बिबटय़ा, अस्वल, सायाळ, रानगवे, रान डुक्कर, ससे, हरीण, भेकर, नाणगे या वन्य प्राण्यांसह राष्ट्रीय पक्षी म्हणून समावेश असणाऱ्या अनेक मोरांचा मुक्त संचार पाहायला मिळतो. मात्र, गेल्या काही वर्षात वन्य प्राण्यांची झालेली शिकार अथवा शिकारीचे प्रयत्न याची आकडेवारी पाहिली असता शिकारीला अटकाव करण्यासाठी एक ठोस कार्यक्रम हाती घेण्याची गरज निर्माण झालीय. विशेष म्हणजे काहीजण हौस म्हणून तर काहीजण पैसे मिळवण्याचे माध्यम म्हणून वन्य प्राण्यांची शिकार करीत आहेत, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. शिकारीच्या घटना रोखण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू, असेही चव्हाण यांनी सांगितले.