ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशात योगी सरकारने वाहतुकीच्या नियमांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. जर कोणी आता वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास दुप्पट दंड वसूल केला जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या नव्या निर्णयानुसार, जर कोणी टू व्हीलर चालवताना हेल्मेट घातले नाही तर आता एक हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. या आधी 500 रुपये दंड आकारला जात होता. तसेच सीट बेल्ट बांधल्याशिवाय गाडी चालवल्यास आता एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. त्या सोबतच नो पार्किंगमध्ये लागोपाठ दोन वेळा गाडी पार्क केल्यास 1500 रुपये दंड वसूल केला जाईल. याआधी पार्किंग नियमांचे पालन न केल्यास पहिल्या वेळी 500 रुपये आणि दुसऱ्या वेळी 1000 रुपये दंड आकारला जात होता.
तसेच वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यास पहिल्यावेळी 1 हजार रुपये आणि दुसऱ्यावेळी या अपराधासाठी 10 पट म्हणजेच 10 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना सरकारकडून जारी करण्यात आली आहे. या सोबतच ऍम्ब्युलन्स आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांना वाट न दिल्यास आता 10 हजार रुपये दंड वसूल केला जाईल. चुकीच्या पद्धतीने किंवा नियमबाह्य पद्धतीने गाडीमध्ये बदल केल्यास 1 लाख रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.