गर्दीने बाजारपेठा फुलल्या ः वाहतूक कोंडीच कोंडी
प्रतिनिधी/ सातारा
जिल्हा अंशतः अनलॉक करण्यात आल्यानंतर शनिवारी व रविवारी विकेंड लॉकडाऊन झाला. या लॉकडाऊनला सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र दुसऱयाच दिवशी म्हणजे पुन्हा सोमवारी बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या आणि खरेदीसाठी नागरिक मोठय़ा प्रमाणावर बाहेर पडले. यामुळे वाहतूक कोंडी होवून वाहनधारकांची कसरत सुरू होती. दरम्यान, जिल्हय़ाची कोरोना परिस्थिती सावरत असताना नागरिक मोठय़ा प्रमाणावर गर्दी करत आहेत. त्यामुळे कोरोना पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन शिथील करत असताना सोमवार ते शुक्रवापर्यंत दुपारी 2 पर्यत अत्यावश्यक सेवा सुरू ठेवल्या आहेत. तर दुकानांना परवानगी नाकारली आहे. तसेच शनिवार व रविवारी विकेंड लॉकडाऊन करुन सर्व सेवा पूर्णपणे बंद केल्या आहेत. पहिल्या आठवडय़ात याला सातारकरांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र सोमवारी रस्त्यावरची गर्दी पाहिल्यानंतर सातारा पुन्हा पूर्वीसारखा सुरू झाल्याचा भास होत होता. कोरोना संपून सर्व काही सुरळीत व्हावे असे सगळय़ांना वाटत आहे. परंतु अशा प्रकारची गर्दी करुन आपण कोरोनाला निमंत्रण दिल्यासारखेच वाटत होते. अशाने पुन्हा कडक लाकडाऊन लागू शकतो.
सोमवारी सकाळपासून सातारकर नागरिक खरेदीला घराबाहेर पडले. भाजीपाला, धान्य खरेदीला गर्दी झालेली होती. तसेच शासकीय, खाजगी कार्यालयात जाणारे कर्मचारी, चाकरमानी घरी परतु लागले. खरेदीची वेळ दुपारी 2 वाजेपर्यंत असल्याने महिलांनी घरातील कामापेक्षा खरेदीला प्राधान्य दिले. एसटी सेवा 50 टक्के क्षमतेने सुरू असल्याने प्रवास सोयीचा झाला आहे.