सत्ताधारी-विरोधकांनी केले स्वागत
प्रतिनिधी /बेळगाव
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेताना कोरोना तसेच महापुरामुळे मोठी हानी झाली आहे. त्यावर सरकार मात करत राज्याच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करत आहे. बऱयाच प्रमाणात त्याला यश आले आहे. आता गाडी रुळावर आली आहे. त्यामुळे निश्चितच येणाऱया दिवसांमध्ये राज्य चांगल्या परिस्थितीत असेल, असे आश्वासन देत 3 हजार 574 कोटींचे अंदाजपत्रक मांडले. त्याला सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी संमती दर्शवत याबाबतीत सरकारच्या पाठीशी असल्याचे ठामपणे सांगितले.
कोविडमुळे राज्यच नाही तर संपूर्ण जगावरच मंदीचे सावट पसरले होते. आर्थिक स्थितीवर विपरित परिणाम झाला होता. दोन वर्षे सर्वांनाच त्याचा फटका बसला आहे. मात्र आता कोरोनाचा प्रभाव कमी झाला असून सर्व व्यवहार सुरळीत होताना दिसत आहेत. त्याचबरोबर जीडीपी आणि जीएसटीमधून मोठा कर मिळू लागला आहे. त्यामुळे निश्चितच राज्याचा विकास होईल, असा आत्मविश्वास असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.
ज्या ठिकाणी कमी कर आकारला जात होता. त्याचे विवेचन करून त्यामध्ये वाढ केली गेली आहे. राज्याचे महसूल उत्पन्न कसे वाढेल, याकडे अधिक लक्ष दिले आहे. केवळ सुपारीसारख्या साहित्यावर कर वाढविल्यामुळे 8 कोटींची उत्पन्नामध्ये भर पडली आहे. असे अनेक घटक आहेत. त्याबाबत आम्ही विवेचन केले असून निश्चितच त्याचा राज्याला फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.
ऑटोमोबाईलमधून बऱयाच प्रमाणात कर मिळत असतो. मात्र तो कर अद्याप रुळावर आला नाही. कारण वाहन खरेदी कमी झाली आहे. त्यामुळे कर वाढविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातील, असे त्यांनी यावेळी सांगितले. नोव्हेंबरपर्यंत 67 टक्के कर वसूल झाला आहे. तो 100 टक्के कसा होईल, याकडे आम्ही लक्ष देत असल्याचे त्यांनी सांगितले. एकूण खर्चामध्येही कपात केली आहे. 5 टक्के इतकी कपात करण्याबाबत अधिकाऱयांशी चर्चा झाली आहे. त्यामुळे पैशाचा बचाव मोठय़ा प्रमाणात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकूणच सर्वांनी सहकार्य करावे आणि राज्याला मजबूत बनवावे, असे आवाहन त्यांनी सभागृहात केले.
विरोधी पक्षनेते एस. आर. पाटील म्हणाले, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. राज्य कोणत्याही आर्थिक अडचणीत असेल तर आम्ही नेहमीच सहकार्य करू. त्यासाठी जे काही करायचे आहे ते करा, त्याला आम्ही पाठिंबा दर्शवू, असे म्हणत या अंदाजपत्रकाला पूर्ण संमती दिली आहे.