प्रतिनिधी/ सातारा
चित्रपटसृष्टीने अनेक क्रांती घडवल्या त्यातून अनेक प्रबोधनात्मक चित्रपट तयार झाले. चित्रपट हे व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी केले. दरम्यान, या पॅनोरमा चित्रपट महोत्सवात रसिकांनी विविध भाषिक चित्रपटांचा आनंद घेतला तर यावेळी चित्रपट लेखक नितीन दीक्षित यांची उपस्थिती खास आकर्षण ठरली होती.
अनुभव फिल्म कलबतर्फे आयोजित भारतीय पॅनोरमा चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक नितीन दीक्षित, प्रमुख पाहुणे तुषार पाटील, अनुभव फिल्म क्लबचे अध्यक्ष शिरीष चिटणीस, दीपलक्ष्मी पतसंस्था व्यवस्थापक विनायक भोसले यांची उपस्थिती होती.
यावेळी क्षीरसागर पुढे म्हणाले, दिग्दर्शक नितीन दीक्षित यांनी वेगळी वाट चोखाळल्यानेच त्यांचे नाव देशभर होत आहे. नितीनजी यांचा कडवी हवा हा चित्रपट पॅनोरमा महोत्सवात दाखवला जातोय ही सातारकरांसाठी भूषणांवह बाब आहे.
शिरीष चिटणीस म्हणाले, प्रादेशिक भाषांचे निवडक व उत्तम चित्रपट पॅनोरमासाठी निवडले जातात. नितीन दीक्षित यांचा कडवी हवा हा चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून भारतभर दाखवला जात असून साताऱयाच्या भूमीपुत्राचा चित्रपट पॅनोरमामध्ये येणे ही बाब सातारकरांसाठी खूप अभिमानाची व मैलाचा दगड आहे. हे दर्जेदार चित्रपट चित्रपट रसिकांसाठी पर्वणी ठरतील, अशी अपेक्षा चिटणीस यांनी व्यक्त केली.
सातारकरांच्या ऋणात कायम राहू इच्छितो, अशा भावना नितीन दीक्षित यांनी सत्कारास उत्तर देताना प्रकट केल्या. ते म्हणाले 1992 साली मी पहिली एकांकिका लिहली होती. त्यानंतर जीवनाच्या अनेक टप्प्यातून जाताना 2017 रोजी कडवी हवा हा बुंदेलखंडी भाषेचा हा चित्रपट हा आपण बनवला. त्यानंतर हलका नावाचा आपला आगामी प्रोजेक्ट येत असल्याचे दीक्षित यांनी सांगितले.
अनुभव परिवाराचे उपाध्यक्ष गिरीश कुलकर्णी, सहसचिव अमित द्रविड, रविंद्र कळसकर, लक्ष्मण कदम, हेमंत भुजबळ, दत्तात्रय सावंत गुलाब, शुभमं बल्लाळ, शांताराम पवार, अभिजित वाईकर, यशवंत शीलवंत, हनुमंत खुडे आदी यावेळी उपस्थित होते.