प्रतिनिधी / सातारा
शिक्षक बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाल जूनमध्ये संपला असून त्यांना सहा महिने वाढीव मुदत मिळाली आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या शिक्षक बँकेच्या निवडणुकीची तयारी शिक्षक समितीने चालू केली असून यावेळची निवडणुक सातारा जिल्हा शिक्षक समिती स्वबळावर लढवणार असल्याचे मत महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे अध्यक्ष उदय शिंदे यांनी व्यक्त केले.
वाई तालुका शिक्षक समितीच्या सहविचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिक्षक समितीचे सरचिटणीस प्रदीप कदम, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन विठ्ठल माने, शिक्षक बँकेचे संचालक किरण यादव, शिवाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उदय शिंदे आपल्या मनोगतात म्हणाले, गेल्या पाच वर्षातील भ्रष्ट कारभाराची माहिती वेळोवेळी आपल्या संचालकांनी दिलेली आहे. यांच्या भ्रष्ट कारभाराला विरोध करण्यासाठी शिक्षक समितीच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मतभेद व मनभेद विसरून एकत्र येण्याची गरज आहे. स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करण्यासाठी शिक्षक समिती शिवाय पर्याय नाही. यासाठी शिक्षक समितीचा झेंडा शिक्षक बँकेवर फडकविण्यासाठी सर्वांनी सज्ज राहा असेही आवाहन त्यांनी केले.
प्रदीप कदम यांनी आपल्या मनोगतातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळत असून आता मागे न हटत एकजुटीने लढूया असे सांगितले. यावेळी सत्ताधारी चेअरमन यांचा गेल्या पाच वर्षातील भ्रष्ट कारभार वेळोवेळी केलेले आर्थिक घोटाळे, बँकेचा सभासदा पेक्षा स्वतःसाठी केलेला गैरवापर, घेतलेले मनमानी कारभाराचे नमुने, या सर्वांना शिक्षक बँकेचे संचालक किरण यादव यांनी आपल्या मनोगतातून समाचार घेतला.
यावेळी शिक्षक समितीच्या विचारणे व कार्याने प्रेरित होऊन शिक्षक संघाचे कार्यकर्ते आदम पाटील यांनी शिक्षक समिती मध्ये प्रवेश केला. यावेळी बि.डी.भोसले, अरविंद ननावरे, सतीश शेंडगे, यांसह वाई तालुक्यातील अनेक सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित होते.तसेच कार्यक्रमास वाई तालुक्याचे अध्यक्ष अनिल पिसाळ, सरचिटणीस यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.