प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना ही मोठी शैक्षणिक आपत्ती आहे. अशी आपत्ती नेहमीच येईल असे नाही. पण आपत्ती आली तर तिला कसे सामोरे जावे याबद्दलचे कोणतेही ध्येय-धोरण भारतीय शिक्षण आयोगाकडे उपलब्ध नाही. आपल्याला शिक्षण व्यवस्था खऱया अर्थाने बळकट करावयाची असेल तर शिक्षण फक्त चार भिंतीमध्ये जखडून न ठेवता किंवा परीक्षेपुरते मर्यादित न ठेवता विविध पर्याय सक्षमपणे उभे करता आले पाहिजेत, असे विचार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांनी व्यक्त केले.
आरपीडी कॉलेजच्या मराठी विभागाने आयक्मयूएसीच्या सहकार्याने दि. 22 रोजी ‘कोविड-19 ने निर्माण केलेली शिक्षण क्षेत्रातील आव्हाने’ या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन केले होते. या चर्चासत्रात डॉ. शिर्के यांच्यासह अमेरिकेतील शिक्षणतज्ञ बिल राडय़ूओव्हीच व हायपरडॉक या अंकात्मक धडय़ांची निर्मिती करणाऱया अमेरिकेतील प्रसिद्ध संस्थेच्या सहसंस्थापिका केरी हिल्टन यांचा सहभाग
होता.
डॉ. शिर्के म्हणाले, सध्या उद्भवलेल्या संकटावर मात करण्यासाठी पर्याय शोधत असताना आपण आभासी शिक्षणावर लक्ष केंदित करत आहोत. पण आपल्याकडे तेही यशस्वी होईल, असे दिसत नाही. त्यामुळे त्यालाही पर्याय शोधणे हेच खरे आव्हान आहे. आभासी शिक्षण पद्धत चालवताना खेडोपाडी विखुरलेला साठ टक्के भारतीय विद्यार्थीवर्ग कोणत्या अडचणींना तोंड देत आहे, याचे वास्तव त्यांनी मांडले.
बिल राडय़ूओव्हीच यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर उभी असणारी शिक्षण पद्धत प्रत्येकाला आपला अवकाश निर्माण करण्यास साहाय्यभूत ठरते. भारतासमोरील आव्हाने तंत्रज्ञानाच्या बळावर अमेरिकेने कधीच मागे टाकली असून, विद्यार्थ्यांनी उत्तम कौशल्ये आत्मसात केली तरच त्यांना उत्तम नोकऱया उपलब्ध होतात. कृत्रिम बौद्धिक संपदा व मिश्रित शिक्षण पद्धती (ब्लेंडेड) शैक्षणिक क्षेत्रात कुठे उपयोगी पडतात, हे त्यांनी स्पष्ट केले.
केरी हिल्टन यांनी आभासी माध्यमातून शिकविताना विद्यार्थ्यांना अधिकाधिक कसे आकर्षित करून घेता येईल, त्यांच्यातील नवनिर्मितीच्या क्षमतांची जागृती कशी साधता येईल, याबद्दल विवेचन केले. यानंतर प्रश्नोत्तराचे सत्र झाले. शेवटच्या सत्रात अमेरिकेतील सीईओ मिलिंद जोशी, आरसीयूचे इंग्रजी विभागप्रमुख डॉ. विजय नागण्णावर, कॉलेज व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्षा बिंबा नाडकर्णी, एसकेई संस्थेच्या सदस्या लता कित्तूर यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक व स्वागत संयोजक आणि कॉलेजच्या प्राचार्या डॉ. शोभा नाईक यांनी केले. वक्त्यांची ओळख डॉ. एम. एस. कुरणी, डॉ. कित्तली व डॉ. ए. एम. पाटील यांनी करून दिली. सूत्रसंचालन पियट कारव्हालो यांनी केले. एस. एस. शिंदे यांनी आभार मानले.
1100 हून अधिक जणांचा चर्चासत्रात सहभाग
डॉ. डी. टी. शिर्के, डॉ. शोभा नाईक, मिलिंद जोशी व निहार कलघटगी यांची ऑनलाईन बैठक झाली. विद्यार्थ्यांसाठी उत्कृ÷ दर्जाचे शिक्षण उपलब्ध करण्यासाठी काय करता येईल, यावर विचार विनिमय झाला. या चर्चासत्राच्या आयोजनाबद्दल वक्त्यांनी आयोजकांची प्रशंसा केली. 1100 हून अधिक जणांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला. https://www.youtube.com/watch?v=jkOXA8sNUUw या संकेतस्थळावर प्रस्तुत चर्चासत्र उपलब्ध आहे.