हिंदी चित्रपट बघण्याचे वय गेले त्याला अनेक वर्षे लोटली. चित्रपटगृहात जाऊन शेवटचा चित्रपट कधी पाहिला ते आता आठवतदेखील नाही. चित्रपटांशी असलेला मनाचा सांधा तुटला आहे. कोरोनामुळे सध्या दिवसभर घरात अडकून पडल्यामुळे वाचनालयांशी संपर्क तुटला आहे. दुकानात जाऊन नवीन पुस्तके आणणे शक्मय नाही. अशा वेळी वर्तमानपत्रे अगदी अधाशासारखी अथ ते इति वाचली जातात. पण नंतर दिवसभर काय करायचे? मग टीव्हीवर जे लागतील ते नवे-जुने चित्रपट पाहिले जातात. काही वेळा नवे चित्रपट आवडतातदेखील. पण त्यातले अभिनेते आणि अभिनेत्री ओळखू येत नाहीत. एखादा, एखादी आवडल्यास आंतरजालावर जाऊन त्यांची नावे शोधतो आणि नंतर विसरून जातो.
समाज माध्यमांवर अनेकदा राखी नावाच्या एका तरुण अभिनेत्रीची सनसनाटी विधाने वाचतो. त्यावर उलटसुलट चर्चा वाचतो. ती अभिनेत्री असली तरी तिचा एकही चित्रपट पाहिलेला आठवत नाही किंवा पाहिला असेल आणि चेहरा ओळखता आला नसेल.
या राखीचे एक विधान परवा वर्तमानपत्रात वाचले. त्याचा पूर्वार्ध भावनिक असला तरी पटला नाही. देशात लशीची टंचाई असल्याने लस घ्यायला नकार देताना ती म्हणते की “तिचा देवावर पूर्ण विश्वास आहे, देव तिचे कोरोनापासून रक्षण करील.’’ देवावर श्रद्धा ठेवायला हरकत नाही. पण कोरोनासारख्या रोगापासून स्वतःला वाचवण्याचे उपाय उपलब्ध असताना देवावर का भार टाकायचा? एका इंग्रजी कादंबरीतला प्रसंग आठवतो. नायकाची कार एका खोल खड्डय़ात पडून नादुरुस्त झाली आहे. मदतीसाठी कोणाला बोलावता येत नाही अशी परिस्थिती. तो देवाचा धावा करतो आणि आपली कार खड्डय़ातून वर उचलून दुरुस्त करून रस्त्यावर ठेवण्याची विनंती करतो. देव म्हणतो, “असे केले तर मीच निर्माण केलेल्या विश्वातील पदार्थविज्ञानाच्या अनेक नियमांची मोडतोड होईल. त्याऐवजी तुला मी खड्डय़ातून बाहेर पडण्याचा मार्ग आणि कार दुरुस्त करण्याचा उपाय सांगतो.’’
तस्मात, देवावर श्रद्धा असली तरी कोरोनापासून वाचण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे, गर्दी टाळणे आणि स्वच्छता ही त्रिसूत्री पाळायलाच हवी.
त्या राखीच्या विधानाचा उत्तरार्ध मला ह्रदयस्पर्शी वाटला. ती म्हणते, “देव माझे रक्षण करील, माझ्या वाटय़ाची लस अन्य गरजू व्यक्तीला द्यावी.’’
लशीची टंचाई लवकर दूर होवो.