बेळगाव येथील गोविंदराम सक्सेरिया विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. माधुरी शानबाग यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी / कोल्हापूर
संशोधन क्षेत्रात चिकाटी, वेगवान कृती आणि अपयशाचा सामना करण्याची तयारी असावी. संशोधन क्षेत्रात पैसा-प्रसिद्धीसोबतच सामाजिक कार्य आणि छंद जोपासता येतात. संशोधन क्षेत्र फक्त बुध्दीवंतांचच हा गैरसमज असून, साधा शेतकरी, कष्टकरीसुध्दा नवनवीन शोध लावून संशोधन करू करतो आहे, असे प्रतिपादन बेळगावमधील गोविंदराम सक्सेरिया विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. माधुरी शानबाग यांनी केले.
शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान सप्ताह सुरू असून शनिवारी पाचव्या दिवशी भौतिकशास्त्र विभागाच्या हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. वनस्पतीशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. वर्षा जाधव, एसएआयएफ-डीएसटी केंद्राचे समन्वयक डॉ. आर. जी. सोनकवडे, भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे फेलो प्रो. एस. आर. यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.शानबाग म्हणाल्या, एकविसावं शतक बौद्धिक संपदेचं आहे. समाजोपयोगी संशोधन करताना आकलन, स्मृति, विश्लेषण आणि सृजन यांसारखे बौद्धिक गुण आत्मसात करावे लागतात. संशोधनात झोकून देवून संशोधनाचे वेगवेगळे पैलू समाजासमोर ठेवण्याची तयारी असली पाहिजे. स्वतंत्रपणे विचार करून संशोधनाअंती समाजोपयोगी निष्कर्ष काढण्याची गरज आहे. जणेकरून आपल्या संशोधनाचा फायदा समाजाला झाला पाहिजे. सध्या संशोधनात महिलांचा टक्का कमी असला तरी अलीकडे संशोधक विद्यार्थीनी तयार होत आहेत. त्या महिला संशोधक स्वातंत्र्याच्या शंभराव्या महोत्सवाचा एक भाग असतील.
भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे फेलो प्रो. एस. आर. यादव, ग्रंथालय विभागाच्या संचालिका डॉ. नमिता खोत यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण इन्स्टिटय़ूट, सातारा व प्रिन्सेस पद्माराजे ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर येथील शंभर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व शालोपयोगी वस्तूंचे वाटप केले. अश्विनी पाटील यांनी सुत्रसंचालन केले. प्रा. टी. डी. डोंगळे यांनी आभार मानले.