5000 लोकांच्या अन्नधान्याची केली सोय
वृत्तसंस्था / मुंबई
देशभरात धुमाकुळ घालणाऱया कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत. कोरोनाचा जोरदार फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला असून अनेक दिग्गज खेळाडूंसह क्रीडा संघटनाही केंद्र व राज्य सरकारला मदत करत आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अपनालय या खासगी संस्थेद्वारे 5000 गरजू लोकांच्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवला आहे. सचिनने ट्विट करत याबाबतची माहिती दिली.
देशात सध्या कोरोनाचे रुग्ण झपाटय़ाने वाढत असून महाराष्ट्रातील आकडाही दिवसेदिवस वाढत चालला असल्याचे पहायला मिळत आहे. या संकटमय काळात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी क्रीडा क्षेत्रातील दिग्गज खेळाडूसह अनेक संघटनाही सरसावल्या आहेत. यातच सचिनने मागील आठवडय़ात कोरोनाग्रस्तांसाठी 50 लाखांची मदत केली होती. आता, यापुढे जात त्याने मुंबईतील अपनालय या सामाजिक संस्थेमार्फत गरजु अशा 5000 लोकांच्या एका महिन्याच्या अन्नधान्याची आणि इतर आवश्यक रेशनची जबाबदारी उचलली आहे. मुंबईतील ही सामाजिक संस्था अनाथ व गरजू लोकांसाठी कार्य करते. देशातील या संकटमय काळात गरजू नागरिकांना मदत करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल अपनालय संस्थेने सचिनचे विशेष आभार मानले आहेत. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सचिनने प्रारंभी 50 लाख व नंतर 5000 लोकांच्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवत सामाजिक कार्यातही अग्रेसर असल्याचे सिद्ध केले आहे.
अन्य खेळाडूंचाही मदतीचा हात
सचिनआधी रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, गौतम गंभीर, सौरव गांगुली, शिखर धवन, अनिल कुंबळे, इरफान पठाण व युसुफ पठाण, शेल्डॉन जॅक्सन या क्रिकेटपटूंनी पंतप्रधान मदतनिधीसाठी सहायता केली आहे. तसेच बीसीसीआयनेदेखील आपले सामाजिक कर्तव्य जपत 51 कोटी रुपयांचा निधी पीएम केअर फंडासाठी दिला आहे. आयपीएलमधील सनरायजर्स हैदराबादनेदखील 10 कोटी रुपयांचा निधी कोरोनाविरुद्ध मुकाबल्यासाठी दिला आहे.