शेतकरी पीक कर्ज अधिकारापासून वंचित
प्रतिनिधी / कसबा बीड
पाडळी खुर्द तालुका करवीर येथील शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहिल्याची घटना प्रथमच निदर्शनात आली आहे. पाडळी खुर्द गावातील शेतकरी रामराव बाबुराव पाटील हे नृसिंह सहकारी विकास सेवा संस्था पाडळी खुर्द या संस्थेचे वर्ग सभासद आहेत. सदर शेतकऱ्याच्या नावे सातबारा पत्रकी जमीन असताना संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळाने 2008 सालापासून आज आखेर पिक कर्ज अथवा संस्थेकडून कोणत्याही प्रकारचा लाभांश दिलेला नाही. तसेच आपला सात बारा , 8 अ उतारा व वेळोवेळी केलेला पिककर्ज मागणी अर्ज दिल्याचे पुराव्यानिशी. त्यांनी लेखी पत्राद्वारे बातमी दिली आहे.
भारत देश हा कृषिप्रधान देश असून शेतकरी हा मुख्य घटक मानला जातो. पण संस्थेचे चेअरमन एक प्रतिष्ठित नागरिक व एका चांगल्या संघाचे संचालक असून त्यांच्याकडून अशा प्रकारचे होणारे वर्तन अशोभनीय आहे. तसेच चेअरमन व संचालक मंडळाचा मनमानी कारभाराने माझे सारखे शेतकरी सभासदावर अन्याय केला जात आहे. त्यांच्याकडून होणाऱ्या या वर्तणुकीमुळे मी कंटाळून गेलो आहे. म्हणून मी विकास सेवा संस्थेला लेखी अर्ज दिला आहे. तसेच जिल्हा उपनिबंधक ऑफिसला लेखी अर्ज देऊन त्याची पोहोच घेतली आहे,अशी माहिती शेतकरी रामराव बाबुराव पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
माझ्या या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार केला नाही व मला पिक कर्ज मिळाले नाही , तर मी कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना लेखी व महाराष्ट्र राज्याचे राज्याचे मुख्यमंत्री साहेबांना मेलद्वारे कळवणार, व मला न्याय देण्याची मागणी करणार. अशा परखड शब्दात शेतकरी रामराव पाटील यांनी आपले मत प्रकट केले आहे.