राज्यातील आघाडी सरकार स्थिर, आर्थिक अडचणीतही सरकार जनतेच्या पाठीशी
प्रतिनिधी/सांगली
निर्यातक्षम दाक्ष, डाळींब आणि फळभाजीपाल्याबाबत शेतकऱयांची गेल्या अनेक वर्षापासून असलेली मागणी लक्षात घेऊन जिल्ह्यात लवकरच रेसिडयू संशोधन सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी बुधवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केली. यावेळी आ. विक्रम सावंत उपस्थित होते.
त्याचबरोबर राज्यातील आघाडी सरकार स्थिर आहे. या सरकारला कोणताही धोका नाही. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली असणाऱया राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आर्थिक अडचणीच्या काळातही सामान्य जनता, शेतकरी आणि गरिबांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले असल्याचेही डॉ. कदम यांनी यावेळी सांगितले.
सचिन वाझे प्रकरणावरून सध्या राज्यात अनेक घडामोडी आणि उलटसुलट चर्चा सुरू आहेत. यावरून डॉ. कदम म्हणाले, मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत. या पोलिसांनी केलेली कामगिरी जगात प्रसिध्द आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसावर कोणी संशय घेऊ नये. राज्यात असणारे तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे. जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. सामान्यांच्या हितासाठी सरकारने आर्थिक अडचणी असतानाही अनेक निर्णय घेतले. तिनही पक्षांमध्ये चांगला समन्वय आहे. त्यामुळे सरकारबद्दल कोणी शंका घेण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले.
रेसिडयू संशोधन केंद्र काळाची गरज
जिल्ह्यात डाळींब व द्राक्षाचे उत्पादन मोठया प्रमाणावर होते. त्याचबरोबर फळभाजांच्या उत्पादनामध्येही जिल्हा अग्रेसर आहे. नाशिकपाठोपाठ जिल्ह्यातून द्राक्ष आणि डाळींबांची निर्यात मोठया प्रमाणावर होते. पण या फळांमध्ये असणारी रेसिडयू तपासणी करण्याचे केंद्र केवळ पुण्यामध्ये आहे. त्यामुळे जिल्हयातील शेतकऱयांची अडचण होत होती. जिल्ह्यात हे संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी आपण मंत्रालयात अधिकाऱयांच्या दोन बैठकाही घेतल्या. या केंद्राची मंजुरी अंतिम टप्प्यात असून लवकर त्याच्या कामाला सुरवात होणार असल्याचेही डॉ. कदम यांनी सांगितले.
कर्नाटकात जाणाऱया लोकांना कोविड चाचणी सक्तीची करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. पण महाराष्ट्रात असा निर्णय घ्यायचा झाल्यास तो राज्य शासनाचा धोरणात्मक निर्णय असेल. पण गरज वाटल्यास राज्य सरकार तो निर्णय घेईल असेही डॉ. कदम यांनी यावेळी सांगितले.