प्रतिनिधी / पलूस
एकीकडे कत्तलखाने खुलेआमपणे सुरू आहेत दुसरीकडे बैलांवर अत्याचार होतात म्हणून शर्यतीवर बंदी घातली जाते हा कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांच्यावर अन्याय आहे. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीवर घातलेली बंदी उठवावी, शेजारच्या कर्नाटक, तामिळनाडू राज्यामध्ये बैलगाडा या नावाखाली बैलगाडयांच्या शर्यती सुरू आहेत. राज्य शासनाने शर्यतीवरील बंदी उठावावी अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलने करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना, बैलगाडी चालक मालक संघटना, शर्यतीप्रेमीच्यावतीने संदीप राजोबा यांनी दिला.
पलूस येथील तहसिल कार्यालयावर शेकडो बैलगाडी चालक मालकांनी बैलगाडी सह कोरोनाचे निर्बंध पाळत मोर्चा काढला. मोर्चामध्ये पलूस तालुक्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. पलूस बाजार समिती आवारातू बैलगाडीसह मोर्चा काढून तहसिलदार निवास ढाणे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संग्राम पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पोपटराव मोरे, यांच्यासह अन्य आंदालक मोठया संख्येने उपस्थित होते.
खिलार बैलांची जंगली प्राण्यामध्ये समावेश करून बैलांच्या खेळावर निर्बंध घातल्याने हजारो शेतकऱ्यांच्यावर संकट आले आहे. बैलगाडी शर्यत बंदीमुळे निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सत्ता आल्यानंतर शर्यतीस वर्षापासून यावर कोणताही निर्णय घेतला न गेल्यामुळे शेतकरी वर्ग संतप्त झाला आहे. शेतकरी हा पोटच्या गोळ्याप्राणे बैलांचे संगोपन करतो, दुष्काळी भागामध्ये तर खिलार बैलांची पैदास करणे हा तेथील शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. शर्यतीवर बंदी घातल्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला असल्याचे मत आंदोलकांनी यावेळी केले.