प्रतिनिधी / सांगली
बुधगाव तालुका मिरज येथील कचऱ्यामुळे गावात दुर्गंधी पसरली असून कचऱ्याबाबत राष्ट्रवादी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. बुधगाव येथील स्मशानभूमी नजीक सांगली-तासगाव रस्त्यालगत साठलेला कचरा व त्यांचा दुर्गंध नागरिकांना असह्य होत असतानाही ग्रामपंचायतीकडून त्याची कोणत्याही प्रकारची विल्हेवाट लावण्यात आलेली नाही. हा कचरा ओढ्याजवळच असल्यामुळे ओढ्याचे पाणी प्रदुषित झाले आहे. परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर ही वाढला आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आता या कोरोनाजन्य परिस्थितीत कोणती नवीन दुर्घटना होण्याची वाट पहायची का ? असा संतप्त सवालही राष्ट्रवादी च्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. बुधगाव ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना याविषयी निवेदन देण्यात आले.
बुधगाव राष्ट्रवादीचे नेते व माजी सरपंच गणेश पाटील यावेळी बोलताना म्हणाले की “नागरिकांचे हाल होत असतानाही ग्रामपंचायत प्रशासन त्यावर मार्ग काढत नाही. स्मशानभूमी जवळच असल्यामुळे ग्रामस्थ तसेच परगांवचे लोकही तिथे येत असतात, अशावेळी तो कचऱ्याचा ढीग ही गावाच्या दृष्टीने लाजीरवाणी गोष्ट ठरत आहेच रोगराई फैलावण्याचाही संभव आहे. कचऱ्याचा उठाव करुन त्याची विल्हेवाट न लावल्यास बुधगाव राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी बुधगाव विधानसभा क्षेत्र युवक कार्याध्यक्ष शक्तीशील पाटील, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष निलेश पवार, सेवा दलाचे माजी जिल्हाध्यक्ष नेताजी जाधव, विद्यार्थी संघटनेचे जिल्हा-प्रवक्ते तेजस सन्मुख, बुधगाव शहर युवक अध्यक्ष महेश सुर्यवंशी, माजी शहराध्यक्ष अमृत भोसले, उपाध्यक्ष संदीप देसाई, प्रकाश भाऊ चव्हाण, सचिन कोंडेकर, प्रविण बंडगर, नागेश पाटील, दिपक पाटील, प्रविण चव्हाण, संतोष आवळे, नितीन पवार, किरण जाधव, नेताजी आवळे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.