प्रतिनिधी / सांगली
भावी पिढी व समाज परिवर्तनात साहित्यिक शिक्षकांचे भरीव योगदान असून मराठी साहित्य लेखनातून शिक्षकांनी आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवला आहे. मातृभाषेचा गौरव मराठी भाषिकांत अधिक वाढवण्यासाठी शिक्षकांच्या अभिव्यक्तीला व भाषिक उपक्रमांना अधिकाधिक संधी शिक्षण-प्रशिक्षण संस्थानी द्यावी, असे प्रतिपादन कवी दयासागर बन्ने यांनी केले ते मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने शिक्षकांच्या ऑनलाइन कविसंमेलनात अध्यक्षपदावरून बोलत होते.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सांगली आणि सांगली जिल्हा मराठी अध्यापक संघ सांगली आयोजित शिक्षक कवी संमेलन उत्साहात संपन्न झाले. यावेळी प्राचार्य डॉ. रमेश होसकोटी, माध्यमिक शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे, उपशिक्षणाधिकारी व साहित्यिक नामदेव माळी, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी सुवर्णा पवार, मराठी विभाग प्रमुख अश्विनी पाटील व विषयसहाय्यक संतोष कदम, जिल्ह्यातील अधिकारी,शिक्षक,विद्यार्थी व साहित्यिक ऑनलाइन उपस्थित होते. सूत्रसंचालन कवयित्री मनीषा पाटील व सुरेखा कांबळे यांनी केले. पंधरा शिक्षक कवींनी कविता सादर करून रसाळ मधाळ मायमराठीचे गुणगान गायिले.
या कविसंमेलनात कवी वसंत पाटील, गौतम कांबळे, बाबासाहेब परीट, विठ्ठल मोहिते, संपत कदम, स्वाती शिंदे- पवार, शाहीर पाटील, सुषमा डांगे, वैशाली आडमुठे, वंदना हुळबत्ते, जस्मिन शेख, मनीषा रायजादे पाटील, ताई गवळी, मनीषा पाटील व सुरेखा कांबळे यांनी कविता सादर करून मराठी भाषेच्या व भाषिकांच्या व्यथा कथांना शब्दरूप दिले. स्वागत विठ्ठल मोहिते यांनी तर आभार मराठी विषय सहाय्यक संतोष कदम यांनी मानले.