प्रतिनिधी / सांगली
गेल्या १ जुन पासून महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. परंतु अजूनही उद्योग धंदे व व्यापार सुरु झाला नाही. सर्व व्यापार आणि उद्योग पूर्ववत सुरु करणेसाठी आ. सुधीर गाडगीळ आणि दीपक शिंदे यांनी आज जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली.
यावेळी सुधीर गाडगीळ म्हणाले कि, ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार अजूनही कमी झाला नसला तरी त्या तुलनेत महानगरपालिकेतील रुग्णांची संख्या घटली आहे. रोजचा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील कोरोनाचा आलेख पाहता.महानगरपालिकेतील रुग्णांची संख्या घटली आहे. राज्यशासनाने १५ एप्रिल पासून लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. ब्रेक द चेन अंतर्गत शासनाच्या आदेशानुसार ३१ मे या कालावधी पर्यत याची व्यापारी वर्गाने कडक अमलबजावणी केली यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णसंख्या कमी झाली आहे राज्यशासनाने प्रत्येक जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी रेट पाहून जिल्हाप्रशासानाला निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील लावलेल्या नियमावलीत शिथिलता देऊन व्यापारी वर्गाना दिलासा द्यावा. लॉकडाऊन मुळे सर्व व्यापारी वर्गाचे प्रचंड हाल व आर्थिक नुकसान झाले आहे.हे नुकसान भरून निघणे अशक्य आहे. त्यामुळे नागरिकांची व्यापारपेठेत होणारी गर्दी टाळण्यासाठी नियम लागू करून सर्व व्यापारी वर्गाबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करावा.
या सकारात्मक चर्चेनंतर जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी २ दिवसात पालकमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. यावेळी माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी डॉ. भालचंद्र साठे, रघुनाथ सरगर, अविनाश मोहिते, गणपती साळुंखे, अमित गडदे, अजयकुमार वाले उपस्थित होते.