लॉकडाऊनचा निषेध; भाजप, सर्व पक्षीय कृती समितीचा पाठिंबा
प्रतिनिधी / सांगली
सततच्या लॉकडाऊनमुळे गलितगात्र झालेल्या व्यापाऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सांगलीत ‘भीक मांगो’ आंदोलन केले. लॉकडाऊन उठवायचा नसेल तर शासनाने कर्मचारी पगार, वीजबिल, घरपट्टी, पाणीपट्टी, घरखर्च, कर्जाचे हप्ते भागविण्यासाठी व्यापाऱ्यांना भीक द्यावी, अशी मागणी यावेळी व्यापाऱ्यांनी केली. व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांच्या नेतृत्वाखाली बालाजी चौक ते टिळक चौक रस्त्यावर मानवी साखळी करण्यात आली होती. भाजपसह सर्व पक्षीय कृती समितीचे पदाधिकारी, कार्यकर्तेही आंदोलनात सहभागी झाले होते.
शहा म्हणाले की, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या १०० दिवसापासून व्यापार बंद आहे. कोरोना नियंत्रणाच्या उपाययोजना करूनही रुग्ण संख्या आटोक्यात येत नसल्याने लॉकडाऊनचा कालावधी सतत वाढत आहे. यामुळे व्यापाऱ्यांची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे.
कर्मचाऱ्यांचे पगार, विविध कर, बँकांच्या कर्जाचे हप्ते, घरखर्च कसा करायचा असा यक्ष प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे. त्यामुळे आता हे खर्च भागविण्यासाठी नाईलाजाने भीक मांगो आंदोलन करावे लागत आहे.
आंदोलनात अनेक व्यापारी संघटनाचे पदाधिकारी, व्यापारी, माजी आमदार नितीन शिंदे, सर्व पक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर, युवा नेते पृथ्वीराज पवार,नगरसेवक धीरज सूर्यवंशी, युवराज बावडेकर, नगरसेविका उर्मिला बेलवलकर, भाजपचे अमर पडळकर आदी उपस्थित होते.