कामगारांचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन, लवकरच तोडगा काढण्याचे कवळेकरांकडून आश्वासन
प्रतिनिधी / कुडचडे
पेप्सी कंपनीशी संबंधित शेळपे, सांगे येथील वरुण बिव्हरेजिस लिमिटेड आस्थापनात कामाला असलेल्या 130 स्थानिक कामगारांना कोविड-19 चा लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ‘ब्रेक’ दिल्यामुळे सदर कामगारांनी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांची भेट घेऊन सदर समस्या सोडविण्याची मागणी करणारे निवेदन दिले आहे. या मुद्यावर लवकरच तोडगा काढू असे कवळेकर यांनी यावेळी सांगितल्याची माहिती कामगार स्टीफन फर्नांडिस यांनी दिली.
गेल्या तीन वर्षांपासून या कंपनीत आम्हा सर्व कामगारांनी मन लावून काम केलेले आहे. यात सांगे, भाटी, वालकिणी, नेत्रावळी व इतर भागांतील कामगारांचा समावेश आहे. सदर कंपनीने 22 मार्च रोजी आधी केलेल्या कामाचा पगार दिला व लॉकडाऊनचे निमित्त करून त्या दिवसापासून ‘ब्रेक’ देण्यात येत असल्याचे सर्व कामगारांना सूचित केले. लॉकडाऊनमुळे सेवा खंडित केलेली असेल असे गृहीत धरून सर्व कामगार निवांत होते, असे फर्नांडिस यांनी सांगितले.
पण राज्यात सरकारने लॉकडाऊन शिथील केल्यावर सदर कंपनीत लगेच जुन्या स्थानिक कामगारांना कामावर न घेता बिगरगोमंतकीय कामगारांना घेऊन तीन शिफ्टमध्ये काम सरू करण्यात आले. यासंबंधी आपण आपल्या कंत्राटदाराला भेटलो तेव्हा त्यांनी सांगितले की, सदर कंपनीबरोबर असलेले कंत्राट संपल्यामुळे ते काहीच करू शकत नाहीत. सदर मुद्दा कंपनीत काम करणाऱया कामगारांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा असल्यामुळे यासंबंधी उपजिल्हाधिकारी तसेच मजूर निरीक्षक कार्यालयात कळविण्यात आले. मात्र त्यावर कोणतीच कारवाई अजून झाली नसल्यामुळे आम्हा सर्व कामगारांनी उपमुख्यमंत्री कवळेकर यांची भेट घेऊन त्यांना या अडचणीसंबंधी निवेदन दिले आहे, असे फर्नांडिस यांनी सांगितले.
यासंबंधी लवकरच तोडगा काढू, असे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले व सदर कंपनीचे अधिकारी मांगिरीश पै यांच्याशी संपर्क साधून त्याचक्षणी या मुद्यावर बोलणी केली. बुधवारपर्यंत कंपनी सविस्तर काय ते कळवेल असे कवळेकर यांनी उपस्थित कामगारांना सांगितले आहे. याअगोदरही कवळेकर यांनी कामगारांना न्याय मिळवून दिलेला आहे व यावेळीही त्यांचे सहकार्य कामगारांना लाभेल. याबद्दल सर्व कामगार त्यांचे आभारी आहेत, असे फर्नांडिस यांनी सांगितले.