भाजपला सोडण्याचा आपला निर्णय योग्यच होता. काँग्रेस हा लोकांना हात देणारा श्रेष्ट पक्ष : साखळीत पक्षाच्या विजयासाठी काम करणार
डिचोली/प्रतिनिधी
साखळी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष राजेश सावळ यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत साखळीत आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात अधिकृतपणे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाचे उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष विजय भिके यांनी राजेश सावळ यांना काँग्रेस पक्षात प्रवेश दिला. सावळ हे गेल्या अनेक महिन्यांपासून काँग्रेस पक्षाबरोबरच कार्यरत असून आता ते अधिकृतपणे काँग्रेसवासी झालेले आहेत.
यावेळी साखळी गटाध्यक्ष मंगलदास नाईक, माजी आमदार प्रताप गावस, नगराध्यक्ष राया पार्सेकर, नगरसेवक धर्मेश सगलानी, राजेंद्र आमेशकर, ज्योती ब्लेगन, कुंदा माडकर, महादेव खांडेकर, प्रवीण ब्लेगन, सुनिता वेरेकर, रेणुका देसाई, निळकंठ गावस व इतरांची उपस्थिती होती.
नगरपालिका निवडणुकीत आपण भाजप पक्षात होतो. त्यावेळी आमदार डॉ. प्रमोद सावंत हे सभापती होते. त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. त्यावेळी आपण भाजपशी फारकत घेतली असता अनेकांनी आपल्या निर्णयावर आक्षेप घेतला होता. परंतु आपला भाजप पक्ष सोडण्याचा निर्णय योग्यच होता. कारण या मुख्यमंत्र्यांनी गोवा राज्याचे नाव डागाळलेले आहे. राज्यात घडत असलेल्या विविध वाईट गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यास हे सरकार फोल ठरले आहे. हे सरकार खाली खेचणे आज काळाची गरज आहे. असे राजेश सावळ म्हणाले.
या भाजपने आपल्या विरोधात अनेक तक्रारी सादर केल्या आहेत. परंतु आपण त्यांना न घाबरता वारोधात राहिलो. अनेकांच्या पोटावर मारण्याची किमया हा पक्ष लिलया साध्य करतात. कोणीही विरोधात बोलल्यास त्यांच्या बदल्या एका ठिकाणाहून दुसऱया कोपऱयात मारण्याचेही काम करतात. परंतु काँग्रेस पक्षाने असे कधीच केले नाही. पाठीवर हात मारून सदैव लोकांना पुढे आणण्याचे काम केले आहे. आज साखळी मतदारसंघात ग्रामीण भागातील लोकांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. हि परिस्थिती बदलण्यासाठीच आपण आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आपणही एक इच्छुक उमेदवार असून पक्षाने तशी संधी दिल्यास मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलताना लोकांचे राहणीमान बदलण्याची हिंमत दाखवणार. सदैव पक्षासोबत राहून पक्षाच्या विजयासाठी काम करणार, असेही राजेश सावळ पुढे म्हणाले.