ऍड. विकास पाटील-शिरगावकर यांच्यासह तिघांचा पोलीस प्रशासनावर आरोप,
प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिल्हा न्यायालयात महागाव (ता. सातारा) येथील प्रतिष्ठीत स्कूलमध्ये 2015 साली सामुहिक बलात्कार व दरोडा प्रकरणी नुकताच निकाल लागला असून यातील संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. तर या तपासकामी संशयितांना नाहक खोटय़ा गुह्यात अडकविले असल्याचे कोर्टाने निकालात म्हटले आहे. त्यामुळे निकाल लागल्यानंतर आता ज्यांच्यावर आरोप झाले ते सर्वजण सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषन विभाग (एलसीबी) व शहर पोलिसांच्या तत्कालीन अधिकारी, कर्मचाऱयांविरुध्द न्यायालयात जाणार असल्याची माहिती संबंधितांनी साताऱयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, या घटनेमुळे जिह्यात खळबळ उडाली असून महागाव प्रकरणात खऱया आरोपींची माहिती असल्याचा दावाच त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
ऍड. विकास पाटील-शिरगावकर, राजेंद्र माने, शिवाजी कांबळे यांनी याबाबतची पत्रकार परिषदेत माहिती दिली. यातील राजेंद्र माने, शिवाजी कांबळे यांच्यावर महागाव प्रकरणी गुन्हा दाखल झालेला होता.
पत्रकार परिषदेत तिघांनी दिलेली माहिती अशी, 11 सप्टेबर 2015 रोजी महागाव येथे एका शाळेत रात्री दरोडा पडला होता. यावेळी वॉचमन म्हणून असणाऱया दाम्पत्यामधील महिलेवर संशयितांनी सामुहिक बलात्कार केला असल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली. संवेदनशील प्रकरणाचा गुन्हा दाखल झाल्याने सातारा शहर पोलीस व एलसीबीने समांतर तपासाला सुरुवात केली. यातील संशयित आरोपी म्हणून एकूण सहाजणांना आरोपी करण्यात आले. सर्वांना एलसीबीच्या तत्कालीन अधिकारी, कर्मचारी यांनी पकडले. मात्र बेकायदेशीररित्या आठ दिवस त्यांनी डांबून ठेवले व त्यानंतर कोर्टात हजर केले असल्याची माहिती त्यांनी दिली.
या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात झाल्यानंतर आमच्याकडून एलसीबीचे पोनि पद्माकर घनवट, सपोनि विकास जाधव, फौजदार रमेश गर्जे, पोलीस हवालदार विजय शिर्के यांनी जबरदस्तीने कोऱया कागदावर सह्या घेतल्या. आम्हाला प्रचंड मारहाण झाल्याने आम्ही भितीपोटी त्यावर सह्या केल्या. चुकीच्या पध्दतीने आमच्याकडून वदवून घेवून आम्हाला आरोपी करण्यात आले. गेली पाच वर्षे आम्ही सर्वजण जेलमध्ये होतो. या दरम्यान आमच्या घरचे व पत्नीनेही सोडले आहे. निर्दोष झाल्यानंतरही आमचे कुटुंब, समाज बलात्कारी म्हणून आमच्याकडे पाहत आहे. कोर्टाने मात्र आम्हाला खरा न्याय दिला असून आता आम्ही सातारा पोलिसांविरुध्द न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, न्यायालयात याप्रकरणातील अनेक बाबी समोर आल्या असून आम्हाला या प्रकरणात गोवण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले आहे. न्यायालयात दाखल झालेल्या आरोपपत्रामध्ये अनेक बाबी त्या समोर आल्या आहेत. यामध्ये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर एका मिनिटांत सातारा पोलीस महागाव येथे 11 किलोमीटर अंतरावर पंचनामा करण्यासाठी पोहचले असल्याची किमया सातारा पोलिसांनी केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीकडून बॅटऱया (टॉर्च) जप्त केल्याचे दाखवले आहेत. कोर्टात त्या बॅटरीमधील सेल पाहिले असता ते 2016 मधील असल्याचे उघड झाले आहे. तसेच महिलेचे चोरलेले दागिने आमच्याकडून जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या दागिन्यासोबत एक पावती पोलिसांनीच जमा केली असता ते दागिने 2016 मधील असल्याची तारीख त्यावर आहे. जर घटना 2015 साली घडली असेल तर सेल व दागिने 2016 सालचे कसे? असा सवाल आम्ही उपस्थित करुन पोलिसांनी या प्रकरणात आरोपींना गोवल्याचे उघड झाले आहे.
बलात्काराच्या आरोपामुळे आम्हा आरोपींचे रक्त डीएनएसाठी घेतले होते. लॅबमध्ये ते रक्त पाठवले असता सापडलेले वीर्य याच्याशी ते रक्त व नमुने जुळले नाही. त्यानंतर पिडीत महिलेच्या पतीचे रक्त नमुने तपासले असता ते त्याच्याशी जुळले आहे. अशाप्रकारे वैद्यकीय सर्वात महत्वाचा पुरावाच आम्ही आरोपी नसल्याचे सांगत आहे. धक्कादायक म्हणजे याप्रकरणात एकजणही फितुर नाही. असे असतानाही न्यायाधिशांनी आम्हाला निर्दोष मुक्त केले आहे कारण खरे आरोपी आम्ही नव्हतो. पोलिसांनी मात्र आमच्याविरुध्द पुरावा तयार केला असल्याचा गंभीर आरोपी त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
संशयितांना पिस्तुल लावून पत्रकार परिषदेत केले होते उभे?
गुह्याचा तपास करत असताना या सहा संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पकडले. याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देत असताना पोलिसांनी संशयितांच्या पाठीला पिस्तुल लावून त्यांना पत्रकार परिषदेत उभे केले होते. कारण ते संशयित वारंवार पोलिसांना आम्ही गुन्हा केला नाही, आम्ही निर्दोष आहोत असे सांगत होते. पत्रकार परिषदेतही संशयित हेच सांगतील या भितीने त्यावेळी संशयितांच्या पाठीला पोलिसांनी पिस्तुल लावली असल्याचे राजेंद्र माने, शिवाजी कांबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच आपल्यावरती काही शेकू नये यासाठी पोलिसांनी हे पुरावे पेरुन संशयितांना अडकविले असल्याचा आरोप ऍड. शिरगावकर यांनी केला आहे.
16 वर्षाच्या मुलाला केले 22 वर्षाचे
या प्रकरणात पोलिसांना 16 वर्षीय नेपाळी मुलास संशयित म्हणून अटक केली होती. यावेळी तो पोलिसांना वारंवार मी 16 वर्षाचा असल्याचे नमूद करत होता. मात्र पोलिसांनी त्यांची अद्यावत बोन टेस्ट करुन त्याला 22 वर्षाचा असल्याचे दर्शवून कोर्टाची दिशाभूल केली होती. कोर्टाने नेपाळ सरकारला त्याच्याबाबत कागदपत्रे मागितली असता, त्यांनी तो 16 वर्षाचा असल्याचे पुरावे दिले, असे ऍड. शिरगावकर यांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक घनवट यांनीच केले आरोपी निष्पन्न
या गुह्याच्या तपास कामी गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालिन पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दि. 18 सप्टेंबर 2015 रोजी या सहा संशयितांचे ठसे घेवून ते जुळतात का याची तपासणी करावी, असा पत्रव्यवहार फिंगरप्रिंट एक्सपर्ट खटावकर मॅडम यांच्याकडे केला. त्यानंतर लगेच त्याच दिवशी घनवट यांनी आरोपी निष्पन्न केले व दुसऱया दिवशी संशयितांवर दोषारोप पत्र दाखल केले. तेही फिंगरप्रिंट एक्सपर्टचा अहवाल यायच्या अगोदरच. त्यामुळे तत्कालिन पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनीच कोणतेही पुरावे न पाहता संशयितांना आरोपी म्हणून निष्पन्न केले.