वंचितचे विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलन
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / पंढरपूर
विठ्ठल मंदिर प्रवेशासाठी वंचित आघडी आणि विश्व वारकरी सेनेच्या वतीने आयोजित आंदोलनात पंढरीत अत्यल्प गर्दी झाली. प्रारंभी एक लाखाच्या गर्दीने मंदिर प्रवेश होईल असा दावा करण्यात आला होता. मात्र आंदोलनात वारकरी आणि कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
31 ऑगस्टपर्यंत मंदिर खुली करा. अन्यथा विठ्ठल मंदिर प्रवेशाचे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला होता. त्यानुसार सोमवारी पंढरीत आंदोलन आयोजित करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने एक लाख वारकरी येतील असा प्रारंभी दावा होता. प्रत्यक्षात एक हजाराच्या आसपास कार्यकर्त्यांची गर्दी आंदोलनात दिसून आली. यामध्ये वारकरी मात्र कमी होते.
या आंदोलनाच्या निमित्ताने प्रकाश आंबेडकर यांच्यासह चार व्यक्ती यांना विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरी पर्यंत सोडले जाऊ शकते. असा एक तर्क आहे. इतर सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी विठ्ठल मंदिरापासून पाचशे मीटर अंतरावर शिवाजी चौक येथे दूर ठेवले आहे. आंदोलनाने हिंसक वळण घेऊ नये. या अनुषंगाने पंढरपुरात 400 पोलिसांचा फौजफाटा तसेच आपत्कालीन परिस्थितीतील सर्व यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.