तरुण भारत संवाद प्रतिनिधी/वैराग
पावसाने उघडीप दिल्यामुळे सध्या सर्वत्र सोयाबीन पिकाची काढणी, मोडणी व मळणी करण्याचे काम शेतकरी वर्गातून होत आहे. सोयाबीन काढण्यासाठी मजूर मिळत नाहीत. अशी सर्वत्र ओरड असताना बार्शी तालुक्यातील पिंपरी ( सा. ) येथे मात्र अजब प्रकार घडला आहे. ठेकेदारांने मजुरांची फसवणूक केल्याची तक्रार मजुरांनी वैराग पोलिसात केली आहे.
पिंपरी येथील शेतकरी आण्णा काशीद यांच्या शेतातील सोयाबीन काढण्यासाठी ठेकेदार आचोबा कांबळे (रा.पिंपरी) यांच्या मध्यस्थीने सोयाबीन काढणी मजुरांची मागणी करण्यात आली होती. त्याप्रमाणे दिवसाला पाचशे रुपये मजुरी ठरवून बाळू आप्पा शिंदे, बाबू किसन लोखंडे, शिवाजी किसन लोखंडे, रमेश संपत लोखंडे आप्पा बाळू कांबळे, मदन आप्पा शिंदे, तानाजी लोखंडे, राम हरी लोखंडे आदी आठ मजूर (सर्व रा. वांगरवाडी, ता. बार्शी) सोयाबीन काढण्यासाठी पिंपरी साकत येथील शेतकऱ्याच्या शेतात आले होते. सोयाबीनची काढणी करून आठ दिवस झाले, तरी मजुरांना ठेकेदाराने काही केल्या पैसे दिले नाहीत. शेतकऱ्यांनी ठेकेदाराकडे पैसे पैसे दिले आहेत असे सांगून शेतकऱ्यांनीही हात वर केले. ठेकेदारानेही आज मजुरी देतो, उद्या देतो. असे करत नादी लावल्याने हातावरचे पोट असणाऱ्या शेतमजुराच्या काबाड कष्टाचे, मोल मजुरीचे पैसे मिळण्यासाठी अखेर मजुरांना वैराग पोलीस स्टेशन गाठावे लागले. तेव्हा पोलिसांनी या मजुरांची पिळवणूक पाहता ठेकेदार संशयित आरोपी आचोबा कांबळे, व शेतकरी अण्णा काशीद रा. पिंपरी ( ता. बार्शी) यांच्याविरोधात तक्रार नोंदवून घेत मजुरांची मजुरी मिळवून देण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते.