शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु प्रा. पी. एस. पाटील यांचे मत : एसकेई सोसायटीतर्फे राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन
प्रतिनिधी / बेळगाव
आत्मनिर्भर भारत योजनेनुसार सोलार ऊर्जा, उत्पादन, त्याचा घरगुती व औद्योगिक वापर करण्यासाठी भारताने स्वयंनिर्मितीवर भर देणे आवश्यक आहे. तरुण पिढीने त्याबाबत अभ्यास आणि संशोधन करायला हवे, असे मत शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु प्रा. पी. एस. पाटील यांनी व्यक्त केले.
एसकेई सोसायटीच्या जीएसएस कॉलेजमध्ये ‘ऍडव्हान्सेस इन सोलार सायन्स : टेक्नॉलॉजी ऍण्ड इनोव्हेशन’ या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. व्यासपीठावर एसकेई सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर, कॉलेज व्यवस्थापक कमिटीचे चेअरमन शरद वालावलकर, मॅग्नम टेक्नॉलॉजीचे संचालक प्रफुल्ल रुगी, प्राचार्य बी. एल. मजुकर, प्रा. तोपिनकट्टी, फिजिक्स विभागाच्या प्रमुख प्रा. सुचेता कुलकर्णी व सचिव डॉ. स्मिता काळगी आदी उपस्थित होते.
ऐश्वर्या हिने ईशस्तवन सादर केले. प्राचार्य बी. एल. मजुकर यांनी स्वागत केले. प्रा. सुचेता कुलकर्णी यांनी फिजिक्स विभागाबद्दल माहिती दिली. प्रा. तोपिनकट्टी यांनी एमएस्सी फिजिक्सबद्दल माहिती दिली. डॉ. स्मिता काळगी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. पी. एस. पाटील यांनी जीएसएस कॉलेजने एमएस्सीमध्ये सोलार एनर्जीबाबत डिप्लोमा कोर्स सुरू केल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन केले.
किरण ठाकुर यांनी अध्यक्षीय समारोप करताना आत्मनिर्भर भारतासाठी विज्ञान व संशोधन कसे महत्त्वाचे आहे, हे पटवून दिले. सूत्रसंचालन डॉ. लता लक्ष्मेश्वर यांनी केले. प्रा. पांडुरंग पाटील यांनी आभार मानले. शुक्रवार दि. 3 रोजी या कार्यशाळेत सोलार विज्ञानाशी संबंधित विषयावर व नोकरीच्या संधींबद्दल चर्चा करण्यात येणार आहे.