प्रतिनिधी/ बेळगाव
स्वरमल्हार बेळगावतर्फे दसऱयानिमित्त शास्त्रीय गायन बैठक उत्साहात पार पडली. प्रारंभी तन्मयी सराफ आणि रंजिता पर्वतीकर यांचे सहगायन झाले. त्यांनी राग यमनमध्ये ‘कैसे पावे ज्ञान तू,’ ‘हा बडा ख्याल आणि किनारे किनारे’, ही मध्यलय त्रितालातील आणि त्यानंतर ‘वारी वारी जाऊ’ ही दुत बंदिश सादर केली.
यानंतर डॉ. स्नेहा राजुरीकर यांनी सूरमल्हार रागात गरजत आये, विलंबित त्रितालातील ‘बडा ख्याल आणि दुत बंदिश’, ‘बादखा बरसन लागी’, अशा दोन रचना सादर केल्या. पं. निवृत्तीबुवा सरनाईक ‘रचित-आये मोरा रे पिया’, ही मारुबिहाग रागातील बंदिश गायली. यानंतर काटा रुते कुणाला नाटय़गीत व रामनामाचे गायन या भैरवीतील अभंगाने बैठकीचे समापन केले.
यावेळी कलाकारांना राजेंद्र भागवत, राहुल मंडोळकर यांनी तबला, योगेश रामदास यांनी संवादिनी व पावनी ऐरसंग हिने तानपुरा साथ दिली. रोहिणी कुलकर्णी यांनी कलाकारांचा परिचय करून आभार मानले.