मत्स्य खात्याची माहिती : पावसाळय़ात नद्या-जलाशयात सोडली होती 9 लाख 83 हजार माशांची पिल्ले : उत्पादनात होणार वाढ
प्रतिनिधी /बेळगाव
मत्स्य संवर्धनाबरोबर उत्पादनासाठी मत्स्य खात्याचे प्रयत्न सुरू आहेत. विविध तलाव, नदी आणि जलाशयातून मत्स्यबीज सोडले जात आहेत. याबरोबर पाण्याची क्षमता अधिक असलेल्या हिडकल जलाशयात मंगळवारी तब्बल 11 लाख मत्स्यबीज सोडण्यात आले. यामध्ये कटला, राहू, गिरमल, मृगल जातींच्या माशांचा समावेश असल्याची माहिती मत्स्य खात्याने दिली.
मत्स्य खात्याकडून दरवषी पावसाळय़ादरम्यान मोठय़ा प्रमाणात माशांची पिल्ले विविध जलाशयामध्ये सोडली जातात. यंदा पावसाळय़ात तब्बल 9 लाख 83 हजार माशांची पिल्ले विविध तलाव, नदी आणि जलाशयातून सोडली गेली आहेत. त्याबरोबर आता उन्हाळय़ात देखील खात्याने माशांची पिल्ले सोडल्यामुळे मत्स्य उत्पादनात साहजिकच वाढ होणार आहे.
जिल्हय़ात मत्स्य शेती करणाऱयांची संख्या वाढली आहे. शेत तलावांची निर्मिती करून मत्स्य पालनाला पसंती दिली जात आहे. पावसाळय़ात सोडलेल्या पिल्लांची वाढ झाली असून ते विक्रीसाठी बाहेर काढले जात आहेत. त्यामुळे स्थानिक बाजारात जवळचे मासे उपलब्ध होत आहेत.
मत्स्य खात्याकडून हिडकल, मलप्रभा, राकसकोप जलाशयात मत्स्यबीज सोडले जाते. मात्र यापैकी हिडकल जलाशयात मंगळवारी 11 लाख पिल्ले सोडली गेली आहेत. यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने पाण्याची पातळी टिकून आहे. त्यामुळे उन्हाळय़ातदेखील माशांची पिल्ले सोडण्याचा निर्णय मत्स्य खात्याने घेतला आहे. याबरोबर किल्ला तलावात देखील 25 हजार माशांची पिल्ले सोडली गेली आहेत. पूर्ण वाढ झालेले मासे विक्रीसाठी बाहेर काढले जात आहेत. मत्स्य उत्पादनाला प्रारंभ झाला असून विविध तलाव आणि शेततलावातून देखील साधारण एक किलो वजनाचे मासे बाहेर काढले आहेत.