केवळ चारच दिवस कामकाज : ग्रामपंचायत निवडणुकीमुळे निर्णय
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला बेंगळूरमध्ये सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. 15 डिसेंबरपर्यंत अधिवेशन घेण्याचा निर्णय यापूर्वी सरकारने घेतला होता. मात्र, चारच दिवसात अधिवेशन गुंडाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विधानसभा आणि विधानपरिषदेचे कामकाज गुरुवारपर्यंतच चालणार आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमुळे विधिमंडळ कामकाज समितीने 10 डिसेंबरपर्यंतच अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच अधिवेशन घेण्यासंबंधीचे वेळापत्रक तयार करण्यात आले होते. मात्र, 22 आणि 27 डिसेंबर रोजी राज्यातील ग्रामपंचायतींसाठी दोन टप्प्यात निवडणूक होत आहे. त्यामुळे मंगळवारी विधिमंडळाचे कामकाज नियोजित तारखेपर्यंत घ्यावे की लवकर गुंडाळावे, याबाबत कामकाज समितीने बैठक घेतली. त्यावेळी 10 डिसेंबरपर्यंत कामकाज चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 15 तारखेपर्यंत होणारे हिवाळी अधिवेशन केवळ 4 दिवसांत गुंडाळण्यात येणार आहे.
राज्यातील अनेक ज्वलंत समस्या आणि विधेयकांवर चर्चा होणे आवश्यक आहे. त्यामुळे समस्यांविषयी चर्चा होण्याची शक्यता कमी आहे. शिवाय विविध विधेयके चर्चेविनाच संमत होण्याची चिन्हे आहेत.