ऑनलाईन टीम / पाटणा :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र व्हॉटसएपवर फॉरवर्ड केल्यामुळे कथित शिवसैनिकांकडून शुक्रवारी कांदिवली येथे राहणारे माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केल्याची घटना नुकतीच समोर आली होती. ही घटना म्हणजे सरकार पुरस्कृत दहशतवाद असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
बिहारचे निवडणूक प्रभारी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी पाटण्यामध्ये पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी फडणवीस यांना मदन शर्मा यांना झालेल्या मारहाणीबद्दल विचारले असता फडणवीस म्हणाले, हे अत्यंत अयोग्य असून हा सरकार पुरस्कृत दहशतवादाचा प्रकार आहे. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून तात्काळ गुंडगिरी थांबवण्यास सांगितले.
पुढे ते म्हणाले, या प्रकरणात सहा आरोपींना अटक झाली. मात्र, अवघ्या 10 मिनिटांत त्यांना जामीन मिळाला आहे. त्यामुळे आता सुशांत सिंह मृत्यूप्रकरणाबरोबर हा मुद्दाही बिहारच्या निवडणुकीत गाजण्याची शक्यता आहे.