संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. अच्युतराव माने : उचगाव मराठी साहित्य संमेलन उत्साहात
प्रतिनिधी / बेळगाव
जेथे श्रम, घाम व अश्रुला महत्त्व आहे, त्याच ठिकाणी साहित्याला महत्त्व आहे. अश्रू हे जगण्याचे माध्यम आहे, तर अश्रू आहेत म्हणून जगण्याचे सामर्थ्य आहे. माणूस आपल्या मातृभाषेवर शतदा प्रेम करतो. भाषा ही त्याच्या जगण्याचे प्रतीक आहे. परंतु सीमाभागात जगण्याचा संघर्ष व सांस्कृतिक अस्मिता गुदमरली जात आहे. ही भाषेच्या अस्तित्वाची लढाई आहे. भाषिक अस्मिता जितकी दाबण्याचा प्रयत्न होईल तितकीच ती त्वेषाने झगडत पुढे येईल आणि आपले अस्तित्व निर्माण करील, असा विश्वास संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. अच्युतराव माने यांनी व्यक्त केला.
उचगाव मराठी साहित्य अकादमी आयोजित 20 वे उचगाव मराठी साहित्य संमेलन रविवारी मळेकरणी देवीच्या आमराईत पार पडले. या संमेलनात प्रा. डॉ. अच्युत माने बोलत होते. यावेळी त्यांनी ‘भाषेसमोरील संकटे व साहित्य’ याविषयी मार्गदर्शन केले.
साहित्य व्यक्त होण्याचे माध्यम
स्वातंत्र्य हा जगण्याचा अधिकार आहे. तसेच आपले मत मांडण्याचाही प्रत्येकाला अधिकार आहे. अवतीभवती घडलेल्या घटना, अनुभव, त्यांचे वास्तव चित्रण लेखक आपल्या लेखनातून करत असतो. माणसाला श्रीमंत होण्यासाठी भौतिक सुखाची गरज असली तरी मानसिक सुख हे साहित्यातून मिळते. बोथट झालेल्या जाणिवा साहित्यातून उर्जित होतात. कवी, कथाकार, लेखक आपल्या साहित्यातून आपली मते समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम करतो, असे प्रा. माने यांनी नमूद केले.
टाळ-मृदंगाच्या निनादात ग्रंथदिंडी
बेळगाव : उचगाव मराठी साहित्य अकादमी आयोजित 20 व्या उचगाव मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ ग्रंथदिंडीने टाळ-मृदंगाच्या निनादात आणि वारकरी, साहित्यप्रेमी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून करण्यात आला.
ग्रंथदिंडी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून प्रस्थान झाल्यानंतर बसस्थानक, उचगाव-कोवाड रोडमार्गे मळेकरणी देवीच्या आमराईमध्ये पोहोचली. तत्पूर्वी सामाजिक कार्यकर्ते अमर जाधव यांच्या हस्ते गणेश पूजन करण्यात आले. ग्रा. पं. सदस्य जावेद जमादार यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाई पूजन तर ग्रा. पं. सदस्य बळवंतराव ऊर्फ बंटी पावशे यांच्या हस्ते श्रीरामप्रतिमेचे पूजन करण्यात आले. पालखीचे पूजन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अध्यक्ष नेहाल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. तर ग्रंथदिंडीचे उद्घाटन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान उचगाव विभाग प्रमुख मिथील जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. तर छत्रपती शिवाजी महाराज पुतळय़ाचे पूजन अमरज्योत शिक्षण सेवा मंडळाचे संस्थापक बी. एस. होनगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. मळेकरणी देवीचे पूजन सहय़ाद्री को-ऑप. पेडिट सोसायटीचे चेअरमन पी. पी. बेळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. सभामंडपाचे उद्घाटन मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांच्या हस्ते तर व्यासपीठाचे उद्घाटन पायोनियर अर्बन बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर यांच्या हस्ते, सरस्वती फोटो पूजन नवहिंद सोसायटीचे चेअरमन उदय जाधव यांच्या हस्ते, ज्ञानेश्वर फोटो पूजन ग्रा. पं. सदस्य शिनोळीचे परशराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
साहित्य संमेलनाचे उद्घाटन अडत व्यापारी टी. एस. पाटील यांच्या हस्ते रोपटय़ाला पाणी घालून करण्यात आले. यावेळी मळेकरणी हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत व महाराष्ट्रगीत सादर केले.
ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार
उचगाव ग्रा.पं. चे नवनिर्वाचित सदस्य बळवंतराव ऊर्फ बंटी पावशे, जावेद जमादार, यादो कांबळे, लक्ष्मण चौगुले, मोनाप्पा पाटील, अमित बंकापूर, नागरत्न कोरडे, स्मिता खांडेकर, अंजना जाधव, रुपाली गिरी, अनुसया कोलकार यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सार्वजनिक वाचनालयाचा जिल्हास्तरीय आर्दश पत्रकार पुरस्कार विजेते व अकादमीचे सेपेटरी एन. ओ. चौगुले यांचा संमेलनाचे अध्यक्ष अच्युतराव माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मण होनगेकर, उपाध्यक्ष कृष्णाजी कदम-पाटील, एन. ओ. चौगुले, माजी ग्रा. पं. सदस्य उषा होनगेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मळेकरणी हायस्कूलचे शिक्षक एल. वाय. कावळे यांचा निवृत्तीनिमित्त अकादमीतर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी लक्ष्मण होनगेकर यांनी प्रास्ताविकात संमेलनाच्या वीस वर्षांच्या प्रवासाबद्दल माहिती दिली. सूत्रसंचालन विजय खांडेकर यांनी केले. एन. ओ. चौगुले यांनी आभार मानले.