वैराग/प्रतिनिधी :
बोरगांव – झाडी ता. बार्शी येथील ग्राम सुरक्षादलाच्या बारा युवकांनी जनावरांची तस्करी करणारी दोन बेकायदा वाहने पकडून वैराग पोलीसांच्या स्वाधीन केली आहेत. ही घटना शनिवारी घडली असून दोघांविरोधात वैराग पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सुमारे साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकाच आठवड्यात तिसरे वाहन जप्त केल्याने जनावरांची तस्करी गंभीर बाब बनल्याचे समोर आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे पोलिसांवर ताण येत आहे .त्यामुळे काही गावात ग्राम सुरक्षा दलाचे युवक व पोलीस मित्र प्रशासनाला सहकार्य करीत आहेत. शनिवार दिनांक १८ एप्रिल रोजी दुपारी चार वाजणयाच्या सुमारास बोरगाव येथे ग्राम सुरक्षा दलाचे युवक उभे असताना रस्त्यावरून दोन वाहने वेगात निघाली होती. ग्राम सुरक्षा दलाचे युवकांना याबाबत संशय आल्याने त्यांनी सदर वाहने थांबवली. असता एमएच १३ सी ८२१३ आणि एम एच १३ ए एन ७४६३ या वाहना मध्ये वाहनाच्या हौद्यामध्ये वासरे कोंबून त्यावर कापड टाकून वरती कॅरेट ठेवण्यात आले होते. शेतीमाल वाहतुकीची वाहने असल्याचे भासविण्यात येत होते. या दोन्ही वाहनात दोन मोठ्या गाईसह ३३ जर्सी कालवडी वासरे तोंडाला चिकटप ट्ट्या लावलेल्या अवस्थेत मिळून आली. ग्राम सुरक्षा दलाच्या युवकांनी सदरची दोन वाहने वैराग पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिली.
यात ग्राम सुरक्षा दलाचे बालाजी लंगोटे, साईनाथ भालेराव, अक्षय चव्हाण, शंकर भोंग, प्रदीप भोंग, राहुल भोंग, प्रकाश भोंग ,प्रदीप लंगोटे, अमोल शिंदे, सुजित बोधले, मारुती चव्हाण ,सुहास भोसले या युवकांनी महत्त्वाची भूमिका बजावली.या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात नागनाथ विठ्ठल गाडेकर ( रा. यावली ) व अब्दुला शकुर मुलाणी ( रा माढा ) ह्या दोघा वाहन चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागच्या दोन चार दिवसांपूर्वी अशाच प्रकारचा अवैध वासरे वाहतूक करणारा पिकअप गौडगाव नाकाबंदी ज्याठिकाणी पकडण्यात आला होता. सदरची वासरे मोहोळ येथून कटईसाठी साठी उस्मानाबाद येथे घेऊन जात होती. याबाबत धनाजी रामगूडे यांनी फिर्याद दिली आहे. वैराग वरून जनावरांची वाहतूक करताना वाहने पकडण्याचा आठ दिवसातला हा दुसरा प्रकार आहे. विशेष म्हणजे ही सर्व वाहने गावातील कार्यकर्त्यांनी किंवा ग्राम सुरक्षा दलाच्या युवकांनी पकडली आहेत. नाकाबंदी असतानासुद्धा जनावरांची वाहतूक होतेच कशी? याबाबत उलट-सुलट चर्चा होत असून वैराग वरून सदरची वाहने पुढे जातातच कशी याबद्दल चर्चा सुरू आहे. वाहने पकडल्यानंतर मिटवा मिटवी साठी येणाऱ्या लोकांची माहिती घेण्यासाठी वैराग पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज बघणे अत्यंत गरजेचे बनले आहे. असे बोलले जात आहे. सदरची वासरे बार्शी येथील गोशाळेत जमा करण्यात आली आहेत. गोशाळेत वासरे जमा करत असताना येथील दोन वासरे मृत झाल्याचे दिसून आले आहे.