प्रतिनिधी / कणकवली:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्रच लॉकडाऊन असल्याने व काम, धंदे बंद असल्याने रास्त दराच्या धान्य दुकानांवर गर्दी होत आहे. तसेच केशरी कार्डधारकांनाही धान्य मिळण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर अंत्योदय, प्राधान्य गटातील कार्ड व केशरी कार्डधारकांसाठी मिळणारे धान्य व दराबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे.
त्यानुसार अंत्योदय कार्डाकरिता 10 किलो गहू प्रतिकिलो 2 रुपये प्रमाणे व 25 किलो तांदूळ प्रतिकिलो 3 रुपये प्रमाणे तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत 5 किलो तांदूळ मोफत मिळणार आहेत.
प्राधान्य गटातील कार्डकरिता प्रतिव्यक्ती दोन किलो गहू दोन रुपये दराने व प्रतिव्यक्ती 3 किलो तांदूळ 3 रुपये प्रमाणे तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत 5 किलो तांदूळ मोफत मिळणार आहेत.
केशरी कार्डधारकांसाठी 3 किलो गहू प्रति व्यक्ती प्रति किलो 8 रुपये प्रमाणे, तर 2 किलो तांदूळ प्रतिव्यक्ती प्रति किलो 12 रुपये दराने मे व जून या दोन महिन्यांसाठी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.